जिल्ह्यातील तापमानात वाढ होणार
-----
हवामान अभ्यासकांचा अंदाज; परतीच्या पावसाची शक्यता मर्यादित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२० : पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर शेतकरी चिंतातूर आहेत. आता परतीच्या पावसावर उर्वरित खरीप हंगाम व आगामी रब्बीचा हंगाम अवलंबून आहे. असे असले तरी हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पावसाची स्थिती तुरळक राहील. काही दिवस हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. २२ ते २५ सप्टेंबरला दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
हा पाऊस संवाहनप्रक्रियेद्वारे येण्याची शक्यता अधिक आहे. जमिनीच्या तापामुळे हवा वर जाते. आर्द्रता घन होते व स्थानिक सरी पडतात. देशात मान्सून उत्तर-पश्चिम भागातून माघार घेत आहे. बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा विकसित होत आहे. तो पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. तो मुख्यतः ओडिशा व आंध्र प्रदेशाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व व मध्य भारतात पाऊस वाढेल. जिल्ह्यावर याचा मर्यादित प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत.
तापमान व उकाडा वाढण्यामागे तांत्रिक कारणे आहेत. पाऊस ओसरल्यानंतर ढग विरळ होतात. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत थेट पोहोचतात. जमीन तापते, आर्द्रता कायम राहिल्याने घाम बाहेर जात नाही. त्यामुळे उकाडा जाणवतो. एल निनोच्या प्रभावामुळे आर्द्रतायुक्त हवा कमी येत आहे. मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकल्याने स्थानिक स्थिरता वाढते. त्यामुळे तापमानात वाढ होते. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस असेल. आर्द्रता जास्त राहील. ढगाळ वातावरण काही प्रमाणात कायम राहील.
एकूणच २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पाऊस तुरळक स्वरूपात पडेल. दुपारच्या संवाहनप्रक्रियेद्वारे काही सरी येऊ शकतात. तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.