
नाशिक : चैत्रोत्सवात प्रतिदिन ३० हजार नारळांची उलाढाल
पिंपळगाव (जि. नाशिक) : देवीच्या पूजेमधील महत्वाचा घटक म्हणजे नारळ. नारळाला धार्मिक व व्यापारी दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतल्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायावर दिसू लागला. सध्याच्या नारळ (Coconut) बाजारातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनी सुरू झालेल्या चैत्रोत्सवात सप्तश्रृंगगडाच्या (Saptashrung Gad) बाजारपेठेत दिवसागणिक हजारो नारळांची उलाढाल होत आहे.
तेरस, चौदस व पौर्णिमेला नारळांची उलाढाल लाखांचा टप्पा पार करेल, अशी माहिती नारळ व्यापारी अमोल पवार यांनी दिली. गडावर यंदाच्या चैत्रोत्सवात रोज ३० हजार नारळांची विक्री होत आहे. कोरोनाकाळात (Corona) मंदिर पूर्णपणे बंद असल्यामुळे नारळ विक्रीच होऊ शकली नाही. पर्यायी व्यासायिकांना आर्थिक झळ बसली. मंदिराची कवाडे उघडल्यामुळे भाविक देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा नारळांसह इतर साहित्याची पूर्ववत विक्री सुरू झाली.
हेही वाचा: नाशिक : मुदतवाढ मिळालेल्या ‘ब’ वर्ग पतसंस्थांच्या निवडणुका जाहीर
चैत्रोत्सवामुळे नारळ विक्रीस बूस्ट मिळेल, असा विश्वास बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. येथील बाजारातील नारळाची महिन्याची उलाढाल सुमारे २५ ते ३० लाखांची आहे. कोरोनाकाळात नारळ व्यावसायिकांना मोठा फटका बसला. मंदिरे उघडण्याच्या निर्णयामुळे आता या बाजारपेठेत व व्यावसायिकांमध्ये थोडा उत्साह संचारला आहे. सामान्य काळात येथे रोज किमान एक ट्रक नारळाची घाऊक बाजारात विक्री होते. मात्र दोन वर्षापासून आर्थिक घडी विस्कटल्याने नारळ विक्रेते संकटात होते. रोजचा संघर्ष सुरू झाला होता. आता निर्बंध काढल्याने भाविकांचा दर्शनासाठी ओघ कायम राहिल्यास पुन्हा एकदा उलाढाल सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. घाऊक बाजारात नारळाचे दर २५ ते ३० रुपये आहे.
हेही वाचा: म्हणतात ना...देव तारी त्याला कोण मारी...
"उत्सवात प्रतिदिन ५० हजार नारळ खपायचे. गेल्या दोन वर्षांच्या काळात अल्प प्रमाणात नारळ विक्री झाली. मंदिर दर्शनासाठी खुले राहिले तर भाविकांची रेलचेल सुरू असते अन् भाविक दर्शनासाठी येत राहिले की नारळांची मागणी वाढते. चैत्रोत्सवात देवीच्या खानदेश प्रांतातून दर्शनासाठी येणारे भाविक नारळ व प्रसादाला विशेष महत्त्व देतात."
- अमोल पवार, नारळ व कुंकवाचे व्यापारी
Web Title: Turnover Of 30000 Coconuts Per Day In Chaitrotsav Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..