Dhule News : फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे असे चार महिने दहावी, बारावीपासून अन्य विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. परीक्षा म्हटली, की अनेक विद्यार्थ्यांना दडपण व ताण येतो; परंतु त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा ताणतणाव न घेता निखळ वातावरणात परीक्षेची तयारी सुरू ठेवावी, असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी अभिनव गोयल (आयएएस) यांनी दिला.
परीक्षा व एखाद्या पेपरचा तणाव जाणवल्यास पालक, जवळचे मित्र, शिक्षकांसोबत संवाद साधावा. अभ्यासात स्वतःला व्यस्त न ठेवता रोज खेळण्यासाठी काही वेळ काढावा. (Tips from Collector Goyal to students of various exams including 10th 12th dhule news)
पौष्टिक आहारातून आरोग्य चांगले राखावे, असा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आहे. स्पर्धेत अधिकाधिक गुण मिळविण्याची स्पर्धा बघायला मिळते. परंतु इतरांशी स्पर्धा करून जीवन तणावात आणण्यापेक्षा आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिल्यास अधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते.
उपाययोजना करा
परीक्षा कालावधीत दिनचर्या बदलून जाते. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याचा आग्रह अनेक पालकांकडून केला जातो. दडपण येण्याचे हे एक कारण ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणे दिवसभरात छंद जोपासणे, खेळण्यासाठीही वेळ दिला पाहिजे.
परीक्षेची तयारी करताना, तसेच परीक्षा कालावधीत छोट्या उपाययोजना करताना तणावाला विद्यार्थ्यांपासून दूर ठेवता येऊ शकते, असा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे.
विद्यार्थ्यांनो, हे करा....
-तणाव दूर ठेवा.
-परीक्षा कालावधीत अभ्यासाचे योग्य नियोजन करा.
-दिनचर्या ठरवा, शक्यतो सकाळी लवकर उठून अभ्यास करा.
-मोबाईल, टीव्हीचा वापर शक्य तितका कमी करावा.
-आपल्या मित्रांसोबत ग्रुप डिस्कशनने विषयांची उजळणी करा.
-एखाद्या विषयाची संकल्पना लक्षात आली नाही, तर शिक्षक, भावा-बहिणीशी संवाद साधा.
-अभ्यासाप्रमाणे छंद जोपासणे, खेळण्यासाठी वेळ द्या.
-आपल्या पालकांसोबत संवाद साधताना काही अडचण असेल तर त्यांना सांगा.
-परीक्षेत सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, मात्र दडपण घेऊ नका.
-रोज ध्यान, योगसाधनेतून एकाग्रता वाढवा.
-एखादा पेपर अवघड गेला, तर फार विचार न करता पुढील पेपरच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा.
-पौष्टिक आहार करताना आपले आरोग्य चांगले राखा.
-पुरेशी झोप घेत मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवा.
पालकांनो, तुम्ही ही काळजी घ्या!
-या कालावधीत घरी हसत-खेळत वातावरण राहील, याची खबरदारी घ्यावी.
-परीक्षा कालावधीत प्रत्येक पेपरनंतर पाल्याला प्रोत्साहन द्या.
-जास्त गुण मिळविण्यासाठी पाल्यावर दडपण द्यायला नको.
-दैनंदिन संवाद साधताना पाल्याच्या अडचणी जाणून घ्या.
-अचानकपणे दिनचर्येत बदल करून, टीव्ही-मोबाईल पूर्ण बंद करून जास्तीत जास्त अभ्यासाचा आग्रह करू नका.
-आपला पाल्य तणावात असल्याचे जाणवल्यास शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
-पाल्याच्या मित्रांशी संपर्कात राहून त्यांच्याकडूनही माहिती जाणून घ्या.
"अधिक गुण मिळविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थी परीक्षा कालावधीत तणावात येतात; परंतु अभ्यासाचे दडपण न घेता, संतुलित दिनचर्या राखत अभ्यासाचे नियोजन करावे. पालकांनीही पाल्यांशी सुसंवाद साधताना पोषक वातावरण निर्माण करावे. त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी." -अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे
"साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन सेवा दिली जाते. यासोबत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट एम पॉवरतर्फे समुपदेशन सेवा दिली जाते. विद्यार्थी, पालकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा." -डॉ. हरीश मेहरा, मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, धुळे
टेलीमानस, एम पॉवर हेल्पलाइन सेवेत
विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आल्यास पालकांनी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व खासगी कोचिंग कलासेसनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक ताण-तणाव व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाच्या टेलीमानस हेल्पलाइन क्रमांक- १४४१६/ १८००८९१४४१६, एम पॉवर संवेदन हेल्पलाइन क्रमांक १८००१२०८२००५० यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.