Nandurbar News : दोन दिवसांपासून जयनगरसह परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतीचे विशेषतः फळबागांचे अतोनात नुकसान झाले. गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास झालेल्या पावसाने केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान झाले. (unseasonal rains along with gale force winds orchards were severely damaged nandurbar news)
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.हवामान खात्याने २७, २८, २९ एप्रिलला अवकाळी पाऊस पडेल याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री जयनगरसह परिसरास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने जोरदार पावसाने झोडपले. या पावसामुळे परिपक्व झालेल्या केळी घड व झाडे खाली पडलेआहेत.
परिसरात मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून, शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर महागडी खते तसेच फवारणी करून चांगल्या दर्जेदार अशा देशविदेशात जाणाऱ्या निर्यातक्षम केळीच्या बागा फुलविल्या होत्या.
मात्र एका रात्रीत झालेल्या वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. जयनगर येथील शेतकरी भगवान पाटील, विठोबा माळी, जितेंद्र पाटील, शरद पाटील, किशोर माळी, दिनेश माळी, दत्तू माळी, किशोर माळी, धोंडू माळी, सखूबाई माळी, आशाबाई पाटील, कुणाल पाटील, निर्मला पाटील, दत्तू माळी या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे इतर रब्बी पिकेही वाया गेली आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जयनगर परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पीकविमा कंपन्यांनी दखल घ्यावी
जयनगर येथील अवकाळी व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे केळी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे. त्या अनुषंगाने पीकविमा कंपन्यांनी त्वरित प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पीकविमा अदा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
वडाळी-जयनगर रस्ता बंद
जयनगर ते वडाळी रस्त्यालगत सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर येऊन पडल्याने काही वेळापर्यंत वडाळी ते जयनगर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करत वाहतूक सुरळीत केली.
"निसर्गाच्या असमतोल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या बदलामुळे शेती करणे येणाऱ्या काळात अवघड होणार आहे. केळीसारख्या पिकामध्ये लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामानाने होणारे नुकसान शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून, सद्यःस्थितीत केळीचे दर नैसर्गिकरीत्या कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे." -भगवान पाटील, केळी उत्पादक शेतकरी, जयनगर
"दर वर्षी अवकाळी पाऊस थैमान घालतो. केळी, पपई पिकांवर लाखो रुपये शेतकरी खर्च करत असतो. वादळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. बहुतांशी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडून विमा काढलेला असतो. मात्र कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यास मदत करावी जेणेकरून शेतकरी जगेल." -विठोबा माळी, केळी उत्पादक शेतकरी, जयनगर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.