295 ways for wildlife on samruddhi highway nagpur news
295 ways for wildlife on samruddhi highway nagpur news

'समृद्धी'वर वन्यप्राण्यांसाठी २९५ उन्नत, भुयारी मार्ग; पुलाखाली बसविणार ध्वनिरोधक यंत्रणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांच्या मुक्तवावराचा विचार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या या महामार्गावर २९५ ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. महामार्गाच्या आराखड्यात तसा बदल केला आहे. वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी भुयारी मार्ग व पुलाखाली ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 

रस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत, म्हणून फार तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जाळ्यांचे कुंपण घातले जाते. परंतु, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो. समृद्धी महामार्ग सुमारे ७०० किलोमीटरचा आहे. केवळ सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे. १४ जिल्ह्यांतून हा महामार्ग जात आहे. त्यांपैकी ११८ किलोमीटरचा पट्टा हा वनक्षेत्रातून जातो. भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर केलेल्या पाहणीनुसार या परिसरात नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, रानडुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी प्राणी, तसेच रानमांजर, बिबट, सोनेरी कोल्हा, भारतीय कोल्हा, भारतीय लांडगा, पट्टेवाला तरस, अस्वल यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. 

या वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून जाणाऱ्या महामार्गावर त्यांचा मुक्तसंचार व्यत्ययविरहित राहावा. तसेच निर्धोक व नैसर्गिकरीत्या त्यांना महामार्गाच्या या बाजूकडून त्या बाजूला सहजपणे जाता यावे, यासाठी १७९७ संरचना करण्यात येत आहेत. त्यापैकी वनक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर पाच मोठे पूल, १९ लहान पूल, १९ भुयारी मार्ग, सात उन्नत मार्ग यांसह आणखी लहान-मोठ्या अशा २९५ संरचना करण्यात येणार आहेत. महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात. त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयारात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे राज्याच्या कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किंवा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल, तर सर्वांत आधी वन्यजीवांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यावर प्राधान्य दिले आहे. 

भारतीय वन्यजीव संस्थेने दिलेल्या सूचनेनुसार, समृद्धी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे उन्नत आणि भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. 
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com