नागपूर : टीव्हीवर आपण महाभारत बघितलीच आहे. लॉकडाउनच्या काळातही ते पुन्हा दाखवण्यात येत आहे. यात तुम्हाला एक गोष्ट खटकली असेल किंवा पटली नसेल.(?) ती म्हणजे अर्जुनला सर्वश्रेष्ठ धनुर्धर करण्याची शपथ... कौरव आणि पांडवांना शिक्षण देण्यासाठी महामहीम भीष्म यांनी गुरू द्रोणाचार्य यांची निवड केली होती. ते प्रमाणिकपणे कौरव आणि पांडवांना शस्त्र आणि शास्त्राचे धडे देत होते. शिक्षण देत असताना ते अर्जुनचे कौशल्य बघून प्रेमात पडतात आणि त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बणवण्याचं वचन देतात. याच वचनामुळे अनेक प्रसंग घडतात...
महाभारतातील एकलव्य आणि कर्ण हे महाण धनुर्धर होते. तरीही अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रसिद्ध झाला. कर्ण सूत पुत्र असल्यामुळे योग्य शिक्षण मिळाले नाही. सन्मान मिळाला नाही. गुरू मिळाला नाही. तरीही तो आपल्या कौशल्याच्या बळावर मोठा धनुर्धर झाला. मात्र, एका श्रापामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. तर एकलव्य याने कोणत्याही गुरूशिवाय ज्ञान प्राप्त केले. गुरू द्रोण यांच्या पुतळ्यासमोर अभ्यास करून चांगला धनुर्धर झाला. मात्र, द्रोणाचार्य यांनी अर्जुनला दिलेल्या वचनामुळे एकलव्यचा अंगठा गुरूदक्षिणेत मागितला आणि अर्जुन सर्वश्रेष्ठ झाला. असाच एक अर्जुन प्रशिक्षण घेण्यासह ज्ञान वाटण्याचे कार्य करीत आहे. त्याचे नाव आहे अभिषेक सुनील ठावरे...
अंगठ्याविनाही "एकलव्य' सर्वोत्तम धनुर्धारी ठरला. पण, अख्खा एक हातच नसेल तर... जिद्दीपुढे आकाश ठेंगणे म्हणतात ना... तेच अभिषेक ठावरेने सिद्ध करून दाखवले. एक हात अधू असतानाही दाताने प्रत्यंचा ओढत तो "आधुनिक एकलव्य' झाला. आज हा एकलव्य लहान मुलांना धनुर्वीदेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.
लहान असताना अभिषेकला ताप आला होता. आई-वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे त्याचा उजवा हात अधू झाला. तरीही तो शिकला. बी. कॉम. झाला. काहीतरी करण्याची जिद्द त्याच्या शांत बसू देत नव्हती. अशात धनुर्धर व तिरंदाजी प्रशिक्षक संदीप गवई यांच्याशी त्याची भेट झाली. येथूनच त्याचा धनुर्धर होण्याचा प्रवास सुरू झाला. सध्या तो महाराष्ट्र पोलिस दलातील कॉन्स्टेबल चंद्रकांत इलग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.
भारतीय सराव संघासाठी देशभरातून निवडलेल्या सर्वोत्तम आठ धनुर्धरांमध्ये अभिषेकचा पाचवा क्रमांक लागतो. असामान्य कर्तृत्वाच्या बळावर केवळ दातांच्या साहाय्याने बाण सोडून अचूक लक्ष्य भेदणारा अभिषेक भारतातील पहिला "टीथ आर्चर' बनला आहे. 28 वर्षीय अभिषेकने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 45 पेक्षा अधिक पदके मिळविली आहेत. आता तर तो सेलिब्रिटी झाला. त्याला "इन्स्पायरिंग हिरो' म्हणून बोलविले जाते. "इंडियाज गॉट टॅलेंट'सह टीव्ही वाहिन्यांवरील अनेक कार्यक्रमांत त्याने कौशल्य दाखविले आहे.
अभिषेक ठावरेचा एक हात अधु आहे. त्यामुळे तो कसा तिर सोडत असेल, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. अभिषेक एका हातात धनुष पकडतो तर दातांनी प्रत्यंचा ओढत लक्ष भेदतो. त्याच्या विशेष कौशल्यामुळे भारतातील पहिला "टीथ आर्चर' असा बहुमान मिळाला आहे. त्याचे बाण सरळ लक्ष भेदतात. यामुळेच तो इतरांसाई इंन्सपायरिंग हिरो ठरला आहे.
नागपुरात सुरू केले प्रशिक्षण वर्ग
विदर्भात अमरावती येथेच धनुर्विद्येचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. मात्र, मी परिस्थिती बदलविणार असे ठरवले. त्यातूनच नागपूर येथे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
- अभिषेक ठावरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.