VIDEO : अवकाळीचा गहू, हरभऱ्याला फटका, हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला

crop damaged due to heavy rain in ambada of nagpur
crop damaged due to heavy rain in ambada of nagpur

अंबाडा/गुमगाव : नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गहू, हरभरा, तूर व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नुकसानीचे सर्व्हे करावा अशी मागणी होत आहे. 

नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. बुधवारपासूनच परिसरात ढगाळलेले वातावरण होते. बुधवारी सायंकाळी आभाळ आल्यापासून गुरुवारी सकाळी ७ वाजता पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परिणामी कापून ठेवलेल्या हरभरा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी हरभऱ्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी हरभरा जमिनीवर पडलेला आहे. हवामान खात्याने गारपिटीचीही शक्यता वर्तवलेली आहे. दरम्यान, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह नरखेड तालुक्यातील, अंबाडा, मेंढला, जलालखेडा, थडीपवनी भारसिंगी, खापा, खैरगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरु होता. शेतात कापून पडलेल्या पिकांना अंकुर फुटत आहे. पाऊस सतत सुरू राहिला तर पिकांचे १०० टक्के नुकसान होण्याची भीती आहे. शासनाने तातडीने पिकाचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

गुमगाव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले हरभरा, गहू, भाजीपाला आणि तूर पिकाला फटका बसला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हातातून गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरिता गहू, हरभरा पिकासोबत भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. एकीकडे हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच काही दिवसांपासून ऊन, सावली व अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. शेतात काढणीसाठी तयार असलेला गहू आणि हरभरा अवकाळी पावसामुळे ओला झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या १५ दिवसांच्या काळात गुमगाव, कोतेवाडा, वागदरा,धानोली, कान्होली, वडगांव-गुजर, लाडगाव,गोधनी, मेणखात, सोंडेपार, सुमठाणा, जामठा, दाताळा शिवारातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, तूर पिकांची काढणी केली. काढणी केल्यानंतर हाताशी आलेली सगळी पिके जमिनीवरच पडून होती. ती अवकाळी पावसामुळे भिजली आहे. अवकाळी पावसानंतर शेतातील काढणी करून ठेवलेले पीक भिजले. आज दिवसभर ताडपत्रीच्या साहाय्याने पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. 

कोरोनामुळे त्रस्त असताना आता अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गव्हासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एक दोन दिवसात गारपिटीचीही शक्यता असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिन्हे आहेत. 
-मिथुन काठाने तारा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com