कालवे झाले तरी एक हजार हेक्‍टर शेती कोरडीच

जलालखेडा ः सिंचनाअभावी कोरडी पडलेली कोरडवाहू शेती.
जलालखेडा ः सिंचनाअभावी कोरडी पडलेली कोरडवाहू शेती.

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील काही भाग सिंचनाखाली आणण्यासाठी 30 वर्षांपूर्वी जाम व कार प्रकल्प निर्माण करण्यात आले. पण, या प्रकल्पाचे कालवे तालुक्‍यातील अनेक गावांच्या बाजूने गेले, पण या गावांचा यात समावेश न करण्यात आला नाही. यामुळे या गावातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांची मागणी असतानाही त्यांची शेती सिंचनाखाली आली नाही. अद्याप त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने नरखेड तालुक्‍यातील एक हजार हेक्‍टर शेती केव्हा सिंचनाखाली येणार, हा खरा प्रश्न आहे.


शेतकऱ्यांच्या अपेक्षा केव्हा होणार पूर्ण?
30 ते 35 वर्षे होऊनही जाम व कार प्रकल्प आपली सिंचनाची उद्दिष्टे गाठू शकली नाही. नेते येतात व आश्वासन देऊन मोकळे होतात, पण काम पूर्ण होताना दिसत नाही. याचप्रमाणे जेव्हा जाम प्रकल्प झाला व त्याचे कालवे नरखेड तालुक्‍यात आले, तेव्हा मात्र हे कालवे एरंडा, खापरी (केने), रोहणा, रानवाडी, मायवाडी, जामगाव (खुर्द), जामगाव (बु.), उमठा, महेंद्री, खापा घुडन या गावाजवळून गेल्यानंतरही या गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

कर्मचारी नाही, चौकीदार नाही...
जाम प्रकल्पाचेच नव्हे तर कार प्रकल्पाचे कालवेही या गावांजवळून गेल्यानंतर ही शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. दोन्ही प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून ह्या गावातील शेती सुटली असून कोरडवाहू शेतकऱ्यांची सिंचनाकरिता पाणी मिळत नाही. रोहणा, एरंडा, रानवाडी, काकडधरा, जामगाव (खोरी) या गावांमध्ये लघुसिंचन विभागाकडून 1982 ते 86 दरम्यान सिंचन क्षमता असलेल्या पाझर तलाव निर्माण करण्यात आले. आता मात्र हे तलाव देखभाल व दुरुस्तीअभावी जीर्ण होऊन शोभेची वस्तू बनले आहे. कर्मचारी नाही, चौकीदारसुद्धा नाही. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर ग्रामपंचायतींना कळविण्यात येते. पण, संबंधित विभाग काहीच लक्ष देत नाही. तलावाच्या लाभक्षेत्रात ही गावे येत असल्यामुळे जाम व कार प्रकल्पाच्या कालव्यातून वगळ्यात आली. पण, प्रत्यक्ष मात्र हे तलाव सिंचन नसलेले तलाव आहेत. यामुळे शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित आहेत.

35 वर्षांपासून साधी दुरूस्ती नाही
ही पाझर तलावे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभाग नरखेड व लघु पाटबंधारे विभाग नागपूर या विभागांनी बांधलेली असून स्थानिक स्तरावर तलावाच्या पुनर्बांधणीकरिता निधी उपलब्ध नसल्यामुळे या तलावांची 35 वर्षांपासून साधी दुरुस्ती सुद्धा झाली नाही. ग्रामपंचायतस्तरावर याबाबत स्थानिक सरपंच यांनी मागणीचे पत्रसुद्धा दिलेले आहे. पण, या विभागांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाचा आढावा घ्यावा, जेणेकरून कोरडवाहू शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असी मागणी माजी सभापती वसंत चांडक यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com