रब्बीच्या क्षेत्रात यावर्षी लक्षणीय वाढ; सोयाबीन शंभर टक्के गेले, कापसाचे उत्पादन घटले

Significant growth this year in the field of rabbi
Significant growth this year in the field of rabbi

जलालखेडा (जि. नागपूर) : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेने वाईट गेल्याने खरिपातील शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचे शेत मोडून रब्बीतील चना व गव्हाची पेरणी केली. नरखेड तालुक्यात रब्बी हंगामात १५,६३४ हेक्‍टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे.

आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत १४,२०० हेक्‍टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र चन्याखाली आले असून ९००० हेक्‍टर क्षेत्रात चन्याची पेरणी झाली आहे, तर गव्हाची ४५०० हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यात गव्हाचे पेरणीक्षेत्र दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहे. तालुक्यात आतापर्यंत ९५ टक्के पेरणी झाली आहे. 

कापसाचा दर ५४०० रुपये आणि वेचण्यासाठी २० रुपये प्रती किलो खर्च, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपतच नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरीविरोधी धोरण मारक ठरते आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

बोंडअळी आणि बोंडसडीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. यामुळे लावलेला खर्चही निघणार नसल्याची भीती नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्‍त केली जात आहे. नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन सोयाबीन, तूर, संत्रा, मोसंबी व कपाशी पिकावर अवलंबून असते.

सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना ह्या सर्व पिकांवर जास्त खर्च करावा लागतो. त्या तुलनेत यावर्षी पिक हाती लागले नाही. यावर्षी सुरुवातीपासून कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. पावसाने कपाशीचे बोंडे ही काळवंडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन कापूस शेती संकटात आली आहे. यावर्षी खरीप पिक शेतकऱ्यांसाठी मारकच ठरले.

निम्मा कापूस मजुरीत

कापूस वेचणाऱ्या महिलांना २०० रुपये रोज मजुरी असून ती दिवसाला ८ ते १० किलो कापूस वेचते. सध्या खुल्या बाजारात कापसाला ५० ते ५२ रुपये किलो भाव मिळत आहे. तर तो वेचणीसाठी २५ रुपये किलो खर्च येत आहे. वेचणी सोडून केवळ २५ रुपये शेतकऱ्यांच्या हातात येत आहे. यातून बहुतांश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चपण निघणार नाही, हे कळून चुकले आहे. कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. 

गव्हाचे पेरणीक्षेत्र दहा टक्‍क्‍यांनी वाढले

सिंचनाची सोय बघता गव्हाची पेरणी जानेवारीच्या अखेरपर्यंत केली जाते. शेतकरी कपाशीचे शेत मोकळी करीत असून ओलीतांची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी गव्हासाठी मशागत सुरू केली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना समाधानकारक गेला नाही. अतिपावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.

तालुक्यातील १५ हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले होते. कापसाला बोंडसडीचा फटका बसला आहे. त्यामुळे अधिक संख्येने शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे. त्याचा परिणाम यंदा रब्बीचे पेरणीक्षेत्र वाढण्यात होऊ लागली आहे, असे तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com