नागपूर : कौटुंबिक आपत्ती आणि कलहामुळे पालकांनी बुद्धविहारात रवानगी केलेली तीन श्रामणेर भिक्खू बालके "लॉकडाउन'मध्ये निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे विहारातून पसार झाली. सर्वत्र संचारबंदी असताना ती रस्त्यावरून मुक्तपणे हिंडताना दिसली. मानकापूर पोलिसांची सतर्कता आणि संवेदनशील अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांची बालगृहात सुखरूप व्यवस्था करण्यात आली.
मानकापूर परिसरात तीन बालके जाडजूड बॅग्स घेऊन जाताना पोलिसांनी दिसली. त्यांचे मळकटलेले कपडे पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना जवळ बोलावले. मानकापूर रिंगरोड ओव्हरब्रिजखाली खुर्चीवर बसवले. त्यांना खायला दिले. प्यायला पाणी दिले. लागलीच त्यांनी जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना बोलावून घेतले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनाही याबात माहिती देण्यात आली.
बालकांची विचारपूस केली तेव्हा मिळालेल्या माहितीने सारेच चक्रावले. आठ ते दहा वर्षे वय असलेल्या या बालकांपैकी दोघे एका आपत्तीग्रस्त कुटुंबातील आहेत. त्यांच्या आईने त्यांना कामठी रोडवरील एका बुद्धविहारात भन्तेजीच्या स्वाधीन केले. आम्हाला श्रामणेर भिक्खू करण्यात आले आहे, अशी माहिती त्यापैकी एका बालकाने दिली. तिसरा मुलगा नारी भागातील असून त्याची आई आजारामुळे मृत पावली. वडील मंडप, डेकोरेशनवाल्याकडे मजुरीला जातात. दारू पिऊन भटकत राहतात. घरी येत नाही. त्यामुळे बालकाच्या काकूने त्यालाही त्याच विहारात भन्तेजीकडे सोपवले होते. त्यांच्या डोक्यावरील खुरटे केस पाहून श्रामणेर असल्याची शक्यता वाटली.
गेल्या दीड वर्षापासून ही बालके याच बुद्धविहारात मुक्कामाला होती. मुलांनी काही खोड्या केल्या, काही वस्तू पाडल्या आणि त्या तुटल्या. त्यामुळे मुलांना कुणीतरी रागावले आणि मारही बसला. त्यामुळे ही बालके कंटाळली. त्यांनी येथून घरी जायचा बेत आखला. आणि ती गुपचूप कामठी रोडवरील संघर्षनगर, शारदा कंपनीपासून त्यांचे कपडे आदी सामान घेऊन पायीच निघाली. मारुती आटोमोटिव्ह चौकातून पॉवर ग्रीड मार्गाने ही बालके वाडीच्या दिशेने जायला निघाली. वाटेत काही लोकांनी त्यांना खाऊ, पाणी, बिस्किटांची पाकिटे दिली. त्यातील काही पाकिटे या बालकांनी रस्त्यात बसलेले भिकारी आणि वेड्या व्यक्तींना खायला दिली. शारदा कंपनीपासून पाच किलोमीटर पायी चालून ती मानकापूर ओव्हर ब्रिजपर्यंत पोहोचली.
पोलिसांनी चौकशी करून वडिलांचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांना बोलावून घेतले. या दोन भावंडांचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. ऑन ड्यूटी असताना मालकाला सांगून ते बालकांजवळ पोहोचले. राजीव थोरात यांनी त्यांची चौकशी केली. ""आम्हा पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला. 10 वर्षांखालील असल्यामुळे न्यायालयाने त्यांना आईच्या ताब्यात दिले. त्यानंतर आईने दुसरा विवाह केला असावा. त्यामुळे यांना विहारात सोडले असावे,'' अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
कोर्ट मॅटर आहे, हा विचार करून आणि दोन्ही बालकांना संरक्षणाची गरज असल्यामुळे त्यांना वडिलांकडे सुपूर्द केले नाही. तिन्ही बालकांना शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यातील एक बालक किडनीच्या आजाराने ग्रस्त असून त्याला तत्काळ उपाचाराची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. तर तिसऱ्या बालकाला घशात त्रास असल्याचे जाणवले. नंतर सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्यांची बालगृहात सुखरूप व्यवस्था करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.