काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

What is the Icornia plant read full story
What is the Icornia plant read full story

नागपूर : महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ती नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य असते. हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली इकॉर्निया बघणाऱ्यांना सुंदर आणि मनमोहक वाटू लागते. मात्र, ही वनस्पती तलावाला आपल्या कवेत घेईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी येत नाही. पाहता-पाहता तलाव हिरवागार होतो. या वनस्पतीपासून जलचरांना धोका आहे.

भंडारा शहराची जीवनवहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी इकॉर्निया वनस्पतीमुळे प्रदूषित झाली होती. या वनस्पतीमुळे मासोळ्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन त्याचा मोठा फटका मत्स्य व्यवसायाला बसला होता. इकॉर्निया असलेल्या नदीचे दूषित पाणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून जाणाऱ्या वेणा नदीत दोन वर्षांपूर्वी इकॉर्निया वनस्पती आढळली होती. याचा पाण्यावर चांगलाच परिणाम झाला होता. तसेच सक्करदरा तलावातही ही वनस्पदी आढळून आली होती. पाण्यावरील तिच्या घट्ट थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि तिच्याद्वारे होणाऱ्या परागसंश्लेषणाच्या प्रक्रियेत पाणी उडून जाते. इतकेच नव्हे तर डासांसारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी जलपर्णी उत्तम जागा ठरते. ती पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी धोकादायक ठरते.

झपाट्याने वाढणाऱ्या या वनस्पतीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया रोग पसरतो, हेसुद्धा संशोधकांनी स्पष्ट केले आहे. इकॉर्नियाच्या आकर्षक रूपावर भाळून गेल्या शंभर वर्षांत ८० देशांतील पर्यटक, वनस्पती अभ्यासक आदींनी ती आपापल्या देशात नेली. आजच्या घडीला किमान पन्नास देशांतील गोड्या पाण्याच्या साठ्यांमध्ये जलपर्णीने आपले हात-पाय पसरले आहेत.

खासकरून आग्नेय आशिया, आग्नेय आणि मध्य अमेरिका, मध्य आणि पश्चिम आफ्रिका या खंडांमध्ये तिचा प्रसार प्रचंड झाला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर, जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरित परिणाम होतो. कीटकांची उत्पत्ती होते. पाण्याचा दर्जा खराब होतो. मासेमारी, जलवाहतूक, जलविद्युतनिर्मिती यांमध्येही अडथळा येतो.

काय आहे इकॉर्निया वनस्पती?

सर्वाधिक उत्पादक वनस्पतींमध्ये इकॉर्नियाचा समावेश होतो. ‘इकॉर्निया क्रासिपिस’ असे तिचे शास्त्रीय नाव. तिला वर्षभर फुले येतात. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करू शकते. त्या बियांचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते. शिवाय ती पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. या कारणांमुळे तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि नियंत्रण करणे कठीण जाते.

आली कुठून इकॉर्निया?

इकॉर्निया वनस्पतीचे मूळ स्थान आहे दक्षिण अमेरिका. १८९६ साली पारतंत्र्यात असलेल्या भारताची राजधानी होती कोलकाता. त्या वर्षी तिथे ब्रिटनचे युवराज आले होते. अनेक देशांतील प्रतिनिधी युवराजांची भेट घेण्यासाठी आले होते. ब्राझीलमधल्या एका अधिकाऱ्याने युवराजांना नजराणा देण्यासाठी म्हणून एका काचपात्रातून आकर्षक रंगाची फुले असलेली एक छोटीशी वनस्पती आणली होती. तीच ही इकॉर्निया वनस्पती, असे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी एकदा सांगितली होते.

पाण्याचा दर्जा बिघडण्याचा धोका

रासायनिक तणनाशकाच्या साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचेही प्रयोग झाले आहेत. पण एका ठराविक मर्यादेच्या बाहेर त्याचा वापर करणे शक्य नाही. कारण, त्यामुळे पाण्याचा दर्जा बिघडण्याचा धोका आहे. जलपर्णीचे नैसर्गिक शत्रू असलेल्या किड्यांच्या (वॉटर हायसिंथ बीटल) साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचे प्रयोग झिम्बाब्वे, केनिया, अमेरिका आदी देशांत यशस्वी झाले आहेत. जलपर्णीवर वाढणाऱ्या बुरशीच्या साह्यानेही तिचे नियंत्रण शक्य आहे; पण अद्याप व्यावसायिक पातळीवर ते उपलब्ध नाही.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com