अमरावती - शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी, या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ७८ टक्के मोहीम पूर्ण झालेली आहे. सर्वेक्षणादरम्यान ८१ हजार नागरिक जोखीम गटातील आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, की अमरावती जिल्ह्यात या मोहिमेसाठी १० लाख कुटुंबांचे लक्ष्य ठेवण्यात आले. आतापर्यंत साडेसहा ते सात लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशी लक्षणे असलेल्यांना जोखीम गटात ठेवण्यात आले असले तरी लक्षणे असल्यासच त्यांची चाचणी केली जात आहे. त्यांची संख्या ८१ हजार इतकी आहे, तर लक्षणे नसलेले मात्र चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले. असे ८ हजार ८०० नागरिक आहेत. त्यातीलही लक्षणे असलेल्यांची संख्या २३७ इतकी आहे. एकूणच या मोहिमेचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी क्षयरुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एक वॉर्ड तयार करण्यात येत असून पुढील आठवड्यापासून त्यामध्ये काम सुरू केले जाणार आहे. पोस्ट कोविड ओपीडीमध्ये शारीरिक सोबतच मानसिक आरोग्य मजबूत करण्यास प्राधान्य दिले जाईल. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सुपर स्पेशालिटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात आकारास येत असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टचे काम पुढील सात दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.