गोंदिया : शासनाने पॅकेज जाहीर करावे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कलावंतांनी बुधवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर गोंदिया जिल्हा कलाकार संघाच्या वतीने शांती मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, प्रशासनाने त्यांचा मोर्चा हाणून पाडला. प्रशासनाने या कलावंतांचा आवाज दाबल्याची आरोप आता होत आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, जनजागृती करण्याचे काम कलावंत करीत आहेत. लोककलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करीत आहेत. फक्त कलेला आपले सर्वस्व मानणाऱ्या कलावंतांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न यातून मिटतो. वर्षातील आठ महिने घराबाहेर राहून समाजप्रबोधन करणारे कलावंत गत आठ महिन्यांपासून उपेक्षिततेचे जीवन जगत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मार्चपासून लॉकडाउन घोषित केला. तेव्हापासून या कलावंतांना बेरोजगारीचे चटके सहन करावे लागत आहेत. अनलॉक मोहीम सुरू झाली असताना आणि हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत असताना शासनाने मात्र, कलावंतांना कला सादरीकरणाला बंदीच घातली आहे. त्यामुळे कुटुंबांसह कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नदेखील कठीण बनला आहे.
दरम्यान, कलावंतांना पॅकेज जाहीर करावे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी जिल्हा कलाकार संघाच्या बॅनरखाली कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले. मात्र, सर्कस ग्राउंडवरून निघणाऱ्या या मोर्चाची वाट सर्कस ग्राउंडवरच रोखण्यात आली. त्यामुळे प्रशासनानेही त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केल्याचे दिसते.
लग्न समारंभ असो वा अन्य कोणतेही कार्यक्रम यात सहसा डीजेचा आवाज घुमतो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून डीजेचा आवाजदेखील बंद आहे. डीजेच्या माध्यमातून रोजीरोटीचा प्रश्न मिटविणाऱ्यांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.