अहेरी (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील महत्त्वाचा तालुका म्हणजे अहेरी. अहेरीला विदर्भात राजनगरी म्हणून ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्याचे सत्ताकेंद्र अहेरीच आहे. परंतु, हीच राजनगरी वर्षानुवर्षांपासून विकासापासून कोसोदूर आहे. नावाला या शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला; मात्र समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नगरपंचायत झाली, आता आपल्या समस्या सुटतील. मूलभूत सुविधांसह आता आपल्याला कशाचीच ददात राहणार नाही, हा जनतेचा समज अल्पावधीत खोटा ठरला. आजही नागरिकांना साध्या साध्या सुविधा मिळत नाहीत. (Aheri-taluka-Rajnagari-in-Vidarbha-Far-from-development-Lack-of-facilities-nad86)
नगरपंचायत तर झाली; परंतु सुविधा पुरविणार कोण? नगरपंचायतीत समाविष्ट गडअहेरी, बामणी, चेरपल्ली हा ग्रामीण भाग उपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नाल्या आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण असल्याने रस्ते अरुंद झालेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यापासून नागरिकांची सुटका करायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हाच राजनगरीचा उद्धार होईल.
राजनगरीच्या मुख्य चौकातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली दिसली. बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी असली तरी वाहतुकीचे तिनतेरा वाजलेले होते. एकापाठोपाठ एक भराभर जाणारे तेलंगणा राज्यातील पिवळ्या रंगाचे आॅटोरिक्षे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे शेजारील राज्यातील मोठी वर्दळ अहेरीत असते, हे लक्षात आले. अहेरीलगतच्या प्राणहिता नदीवर मोठे पूल झाल्याने तेलंगणा राज्यातील लोक अहेरीच्या बाजारपेठेत रस्त्यावर चालताना दिसत होते. परंतु रस्ते बकाल होते. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याची तक्रार स्थानिकांनी केली. या रस्त्यांवरून जाताना पायी, सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा करायला त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
मुख्य बाजारपेठेसह इतरही मार्गांवर अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. लोकसंख्या वाढली, सायकल, दुचाकी, चारचाकी गाड्या चालविणारे लोकही वाढलेत. परंतु त्या तुलनेत रस्त्यांचा काही विकास झालेला नाही. ग्रामीण भाग तसेच तेलंगणातून लोक बाजारपेठेत येत असल्याने रहदारी वाढली. वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आठवडी बाजाराच्या दिवशी परिस्थिती हाताबाहेर जाते.
(Aheri-taluka-Rajnagari-in-Vidarbha-Far-from-development-Lack-of-facilities-nad86)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.