मोर्शी : वरुड तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शिंगोरी गावापासून सहा किलोमीटर अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी याठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच शुक्रवारी रात्री मोर्शी तहसीलसमोर सुरू असलेल्या उपोषण मंडपात एका धरणग्रस्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दिगांबर दहिवडे (रा. टाकरखेड, ता. आष्टी) असे गळफास घेऊन आत्महत्याकरणाऱ्या धरणग्रस्ताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.मोर्शी तहसील परिसरात अप्पर वर्धा धरणग्रस्तांचेविविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शासनस्तरावरप्रलंबित असलेल्या मागण्या ताबडतोब पूर्ण कराव्या, यासाठी अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी रास्ता रोको तसेच विविध प्रकारचे आंदोलने केलीत. परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्रधारकास २५ ते ३० लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, अशा संपूर्ण शेतकऱ्यांना
आजच्या बाजारभावानुसार अनुदान देण्यात यावे आदी धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत. या सर्व मागण्यांची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे २५१ दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे. मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे गोपाल दहीवडे यांनी उपोषणमंडपात आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला शासन-प्रशासन जबाबदार असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
तथापि, गोपाल दहीवडे यांच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी शनिवारी (ता. २७) जोपर्यंत जिल्हाधिकारी भेट देत नाही व मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलग व प्रकल्पग्रस्तांनी घेत उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. पर्यायाने त्याठिकाणी छावणीचे स्वरूप निर्माण झालेले आहे.