अमरावती : आठ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून मारहाणीनंतर तिचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (क्र. पाच) यांच्या न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. स्वप्नील सुभाष पाठक (वय २७, रा. राजहिलनगर, अमरावती), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ८ मे २०१३ रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
पीडित युवती दुचाकीने महाविद्यालयात जात असताना स्वप्नीलने तिला पाठलाग करून अडविले. रस्त्यात दुचाकीवरून ओढून खाली पाडले. युवतीने प्रतिसाद देण्याचे टाळताच तिच्यासोबत वाद घालून मारहाण करून छेडखानी केली. युवतीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, मारहाण, शिवीगाळप्रकरणी स्वप्नील पाठक विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुषमा बाविस्कर यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जे. जी. वाघ यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आरोपी स्वप्नील यास तीन वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. सरकारच्या वतीने अॅड. जे. पी. जामनेकर यांनी युक्तिवाद केला. संजय डहाके, सतीश चौधरी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.