मुलगा पोलिसांना म्हणाला, साहेबऽऽ ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर वडिलांचा नदीत मृतदेहच दिसला जी

The body of a farmer was found in the river at Karkhed
The body of a farmer was found in the river at Karkhed

उमरखेड (जि. यवतमाळ) : शेतीच्या वादाला कंटाळून तालुक्यातील कारखेड येथील शेतकऱ्याने नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत शेतकऱ्याच्या मुलाने माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले असून, कारवाई करण्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. यानंतर चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष तुकाराम कदम (६०) असे नदीत बुडून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची कारखेड येथे शेती आहे. त्यांच्या शेतातील सोयाबीन काढली असून, मारोतराव रामराव कदम, सोनू मारोतराव कदम, परमानंद नारायण कदम व भुजंग नारायण कदम (सर्व रा. कारखेड) या चौघांनी दोन दिवसांपूर्वी वाद घालून मारहाण केली होती. तशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

१० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजता सुभाष कदम हे घरातून अचानक गायब झाले. त्या संदर्भात पोलिस ठाण्यात मिसिंग रिपोर्टसुद्धा दाखल करण्यात आला होता. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता देवसरी शिवारातील पैनगंगा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणात मृत शेतकऱ्याचा मुलगा सुभाष कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चारपैकी परमानंद नारायण कदम यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे व ठाणेदार चोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सतीश खेडेकर करीत आहे.

शेतकऱ्याचा खून की आत्महत्या?

या प्रकरणात मृत्यूपूर्वी शेतकऱ्याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत गैरअर्जदार यांनी मारहाण केली असून ते गुंड प्रवृत्तीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘ठार मारून नदीत फेकून देण्याची धमकी’ दिल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वीच दाखल केली होती. तक्रारीप्रमाणे दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला. यामुळे शेतकऱ्याचा खून की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

शेतकरी सुभाष कदम हे पट्टीचे पोहोणारे असताना ते नदीच्या पाण्यात बुडून कसे मरू शकतात अशी चर्चा कारखेड शिवारात व गावात चर्चिला जात आहे. मृताने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई केली असती तर कदाचित शेतकरी जिवंत राहिला असता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com