बुलडाणा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या २२ टक्के कमी झाला असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.
जिल्ह्यातील ७३ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा आणि लोणार तालुक्यातील १९ गावांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुशंगाने आज २३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती व दुष्काळ व्यवस्थापनाची जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याच्या पाण्यासाठी जलस्रोतांचे अधिग्रहण करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत वर्ग करावेत. त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होणार नाही. याशिवाय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जल जीवन मिशनची कामे पूर्ण करताना पाणीटंचाई काळात देयके भरली नसली त्यांची वीजजोडणी न कापण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी काळातील पशुधनाच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यासाठी चाऱ्याची आवश्यकता आणि उपलब्धता यांचे योग्य नियोजन करण्यास सांगून यंदा चारा छावण्या उघडल्या जाण्याची शक्यता नाही त्यामुळे चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या-ज्या उपाययोजना करणे शक्य आहे, त्या सर्व उपाययोजना करा तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेत वन विभागाकडे असलेला चारा राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्री वळसे पाटील यांनी संबधित यंत्रणेला दिले.
या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार धोरण
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वेगवेगळी कामे हाती घेताना बंधारे बांधकाम करण्यावर भर द्या. जेणेकरून दुष्काळावर मात करता येईल, शेतकऱ्यांना शेततळी, तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तलाव खोलीकरणाची कामे करावीत, जेणेकरून पुढील वर्षी अधिकचा पाणीसाठा जमा होईल.
चारा लागवडीचे नियोजन करा
दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, पशुधन वाचविण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करावे. त्यातुन पशूधनाचीही सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल. पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीचे नियोजन करावे. दुष्काळी परिस्थिती जरी वाढली तरी कोणत्याही परिस्थितीत चाराटंचाई निर्माण होणार नाही, ही बाब विचारात घेत चारा लागवडीचे क्षेत्रनिहाय नियोजन करावे.
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई
संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाबाबत वारंवार आढावा घेऊन आवश्यकता असल्यास टँकरचे नियोजन करा, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित असून, पुढील सहा महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले असले तरी अनधिकृत पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होतो. तो रोखण्यासाठी योग्य कारवाई करावी, असे आदेश त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.
वाळूअभावी कामे थांबवू नका
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन योजनांची कामे मागे पडली असून, ती वेगाने पूर्ण करावीत. वाळूअभावी पाण्याच्या टाकीची कामे थांबता कामा नये, केंद्र व राज्य शासनाचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत. ही कामे करून घेण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कामे मार्गी लावावीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.