अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाकडून आठ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, व्यावसायिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. लॉकडाऊन उठविण्याच्या मागणीसाठी १७ संघटनांचे प्रतिनिधी सोमवारी (ता. एक) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर व्यावसायिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. २८) शहरातील विविध १७ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नितीन मोहोड, एमआयडीसी असोसिएशनचे सुरेंद्र देशमुख, सराफा असोसिएशनचे राजेंद्र भंसाली आदींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कोरोनाची विद्यमान परिस्थिती तसेच लॉकडाउनवर विचारमंथन करण्यात आले.
२२ फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाउननंतरसुद्धा कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही, असे असतानाही जिल्हा प्रशासनाने पुन्हा आठ मार्चपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ करून व्यावसायिकांना पुन्हा एकदा लक्ष्य केले, असा आरोप नितीन मोहोड यांनी केला. आठ दिवसांचे लॉकडाउन व्यापाऱ्यांनी पाळले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा दिसत नाही.
त्यामुळे आता आणखी आठ दिवस प्रतीक्षा करावी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसे असेल तर प्रशासनाने व्यावसायिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला वाहीद खान, मो. शाहीद यांच्यासह भंगार असोसिएशन, कापड असोसिएशन, सराफा असोसिएशन, हॉटेल रेस्टॉरंट ऍण्ड बार असोसिएशनसह १७ व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाढत्या रुग्णसंख्येचा संबंध प्रशासनाने व्यापाऱ्यांशी जोडला आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान प्रशासन भरून काढणार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. लॉकडाउन हटविला नाही तर मंगळवारपासून शहरातील व्यावसायिक आपापली प्रतिष्ठाने उघडतील आणि प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जातील, असा इशारा नितीन मोहोड यांनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.