अमरावती : शहरात आणि जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या प्रशासनाने देखील रुग्ण कमी झाल्याची बाब मान्य केली आहे. मात्र, त्याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. असे असले तरी कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सर्वच घटकांना प्रभावित करून सोडणाऱ्या कोविड- 19 च्या संक्रमणाचा वेग आश्चर्यकारकपणे मंदावल्याचे चित्र मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा वेग अधिक होता. विशेष म्हणजे अमरावतीचा मृत्यूदर सुद्धा विभागात अधिक होता. ऑक्टोबरमध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी दररोज 250 ते 300 च्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण येत होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये स्वतःहून होणारा मास्कचा वापर यासर्व कारणांमुळे रुग्णसंख्या घटल्याचे बोलले जात आहे. 14 ते 20 ऑक्टोबरचा आठवडाभराचा कालावधी लक्षात घेता जवळपास 535 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 16 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच यापूर्वी 300 ते 350 रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह येत होते. त्याची सरासरी घटली आहे.
ग्रामीण भागातही विशेष करून हॉटस्पॉटमध्ये सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. कुठल्याही आजाराचा फैलाव झाल्यानंतर त्याचा 'पिक पिरियड' येतो. त्यामध्ये अनेकांना बाधा होत असते. त्यानंतर हळूहळू तो कमी होत जातो. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोनाची रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी गाफिल राहता कामा नये. खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती.
नागरिकांनी काळजी घ्यावी -
सध्या नवरात्री तसेच त्यापुढील दिवसांत दिवाळीसारखे महत्त्वाचे सण आहेत. सणासुदीच्या या दिवसांमध्येसुद्धा खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाला पोषक असे कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे. सण साजरे करताना सुद्धा मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे गरजेचे आहे.
टॉप पाच तालुके -
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या सर्वांत जास्त अचलपूर तालुक्यात आहे. अचलपूर 37, वरुड व चांदुरबाजारमध्ये प्रत्येकी 14, अमरावतीत 12, अंजनगावसुर्जीत 11, तर मोर्शी तालुक्यात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या मृतांची संख्या 351 आहे.
तारीख (ऑक्टोबर) | पॉझिटिव्ह | मृत्यू |
10 | 113 | 01 |
11 | 120 | 03 |
12 | 23 | 02 |
13 | 96 | 03 |
14 | 54 | 04 |
15 | 72 | 04 |
16 | 119 | 04 |
17 | 109 | 02 |
18 | 75 | 01 |
19 | 28 | 01 |
20 | 78 | 01 |
एकूण रुग्णालय - 17
एकूण बेड- 1565
दाखल रुग्ण- 398
रिक्त बेड - 1164
संपादन - भाग्यश्री राऊत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.