परतीच्या पावसाने झोडपले; आता पीक विमा कंपनी करतेय छळ; रडू रडू दु:ख व्यक्त करतोय शेतकरी

Due to untimely rains, six acres of soybeans became useless
Due to untimely rains, six acres of soybeans became useless

आर्णी (जि. यवतमाळ) : बोगस बियाणे, निसर्गाची अवकृपा, मजूर व मळणीचा अभाव अशा चहू बाजूने घेरलेल्या शेतकऱ्यांनी शेतात कापलेले सोयाबीनचे पीक जमा करून गंज्या लावले आहेत. परंतु, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नुकसानीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अंश्रुधारा निघण्याची वेळ आली आहे.

आर्णी तालुक्यातील लोणी येथे परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनसह कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोणी येथील शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांनी सहा एकर सोयाबीन पिकांची सोंगणी करून शेतात गंजी रचली होती. परंतु, परतीच्या पावसाने थैमान घालत सहा एकरातील सोयाबीन पिकांच्या गंजीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सोयाबीनची गंजी पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आहे. यातून सोयाबीनचा एकही दाना निघण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे. आता ही गंजी गुराढोरांसाठी कुटार म्हणून देणेही शक्य नाही.

लोणी येथील शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांनी सहा एकर कोरडवाहू शेतात सोयाबीनच्या सहा बॅगची पेरणी केली होती. सहा एकरात ३५ ते ४० क्विंटल सोयाबीन पीक होणार होते. परंतु, परतीच्या पावसाने शेतकऱ्याची अपेक्षाभंग केली. यामुळे शेतकरी पुरुषोत्तम चौधरीचे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास एक लाख साठ हजारांचे नुकसान झाले आहे.

यासंबंधी १५ ऑक्टोबरला तालुका कृषी अधिकारी कार्यालय आर्णी येथे अतिवृष्टीमुळे सहा एकरातील सोयाबीन गंजीचे नुकसान झाल्याची लेखी तक्रार दाखल केली. तसेच प्रधानमंत्री पीक विमा कंपनीकडे सुध्दा तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पीक विमा कंपनीने कोणतीही दखल घेलेली नाही. नुकसानीचा पंचनामा सुध्दा केला नाही. त्यामुळे न्याय मागण्यासाठी जाऊ कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

घरची परिस्थिती जेमतेम असून शेतीवर उदरर्निवाह चालविणाऱ्या कुटुंबीयापुढे मोठे संकट उभे झाले आहे. लोणी येथील नुकसानग्रस्त शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पीक विमा कंपनीसह खाजदार, आमदार या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी व पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळून देतील का, असा प्रश्न तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पडला आहे.

शेतकऱ्यांकडे लोकप्रतनिधींची पाठ

लोकप्रिय लोकप्रतिनीधी म्हणून मिरवणारे खासदार, आमदार अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान पाहणी करताना कुठेच दिसून आले नाही. जनू शेतकऱ्यांकडे लोकप्रतनिधींनी पाठच फिरवली असे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

नुकसानीचा पंचनामा अजूनपर्यंत नाही
सहा एकरातील सोयाबीनचे नुकसान झाल्याची रितसर तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय आर्णी व प्रधानमंत्री पीक विमा कंपनीकडे केली आहे. मात्र, पिकविमा कंपनीसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून नुकसानीचा पंचनामा अजूनपर्यंत झालेला नाही. नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत द्यावी.
- पुरुषोत्तम चौधरी
शेतकरी, लोणी, ता. आर्णी

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com