'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'; डॉक्टरांच्या सल्ल्याने खवैय्ये, विक्रेत्यांचं फावलं पण व्यावसायिक घाट्यातच

egg traders are in trouble despite of eggs demand increase in amravati
egg traders are in trouble despite of eggs demand increase in amravati

अमरावती :  कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. ही शक्ती कशाकशाने वाढते याची यादीही आहे. त्यातील अंडी हा बहुतेकांचा आवडता जिन्नस. आता डॉक्‍टरांनीच दररोज एकवेळ तरी अंडी खा, असा सल्ला दिल्याने खवैय्यांचे चांगलेच फावले. त्यामुळेच बाजारात अंडी महागली. मात्र, व्यावसायिक अजूनही घाट्यातच आहे, तर याउलट विक्रेत्यांना अधिक नफा होत आहे. 

कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कोंबड्यांमुळे संसर्ग वाढतो, अशा अफवा पसरल्या होत्या. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला होता. काहींनी कोंबड्या जमिनीत गाडल्या, तर काहींनी मातीमोल भावात विकल्या होत्या. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. शासनाने वारंवार आवाहन करूनही ग्राहक फिरकत नव्हता. त्यात लॉकडाऊनमुळे बाजारपेठाही बंद असल्याने या व्यवसायाला उतरली कळा लागली होती.

सध्या संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज शेकडोंच्या संख्येत संक्रमित रुग्ण आढळत आहेत. उपचारादरम्यान संक्रमित रुग्णांना आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज एकतरी अंड खा, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे अंडीविक्रीच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम झाला आहे. बाजारात या व्यवसायातील मंदी हटून सुगीचे दिवस आलेत. पाच रुपयांना मिळणारे एक अंडे आता दोन रुपयांनी वधारले असून सात रुपये दर मिळू लागला आहे. बंद पडलेली अंडीविक्रेत्यांची दुकाने अनलॉकमधील मिशन बिगीन अगेनमध्ये सुरू झालीत.

अंड्यांची मागणी वाढली -
अंडी खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात असल्याने त्याचा बराच सकारात्मक परिणाम विक्रीवर झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून मागणीत वाढ झाली आहे. कालपर्यंत ग्राहकांची असलेली प्रतीक्षा संपली आहे, असे ठोक विक्रेता प्रहेस ठाकूर यांनी सांगितले.

नुकसान टळले -
अफवांमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. प्रारंभी अंडी विकायची कुठे? असा प्रश्‍न होता. कोंबड्यांच्या देखभालीचा खर्च सहन करावा लागला. आता बाजारातून मागणी येऊ लागली आहे. व्यवसायाचे चक्र नियमित झाले, असे पोल्ट्री व्यावसायिक सुरेशसिंग ठाकूर यांनी सांगितले.

थकवा दूर होण्यासाठी अंडी उपयुक्त -
आजारात दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे व आजारामुळे होणारी झीज तातडीने भरून काढण्यासोबतच रोगप्रतीकारशक्ती वाढण्यासाठी अंडी उपयुक्त आहेत. अंडी हे संपूर्ण आहार असून त्यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स, फायबर आहेत. जी शरीर साधारणतः तयार करू शकत नाही ती अंड्यांतून मिळतात. त्यामुळे अंड्यांचे सेवन करणे योग्य आहे, असा सल्ला डॉ. विक्रम वसू यांनी दिला.

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com