निवडणुकीचा खेळ बनला ‘वरली मटक्‍याप्रमाणे’

zp sabhapati.jpg
zp sabhapati.jpg

बुलडाणा : आजकालच्या निवडणुका म्हणजे माल लगाओ, माल मिलेगा असा वरली मटक्‍या सारखा खेळ झाला आहे. निवडणुकीत पैसा लावायचा आणि लोकप्रतिनिधी बनले की, तो मिळवायचा अशाप्रकारची अवस्था झाल्याने आज लोकप्रतिनिधींवरील जनतेचा विश्वास उडत चालला असल्याचे रोखठोक प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी आज (ता. 23) जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात केले.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदी महाविकास आघाडीच्या ज्योती अशोक पडघान, पूनम विजय राठोड, रियाज खान पठाण व राजेंद्र पळसकर यांची काल निवड झाली. या चौघांचा पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला होता. पदग्रहणापूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमात खासदार जाधव बोलत होते.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पत्नी रजनीताई शिंगणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, राष्ट्रवादीचे गटनेते राम जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्यासह नवनिर्वाचित सभापतींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

‘ठेकेदारांनी सदस्यत्वाची प्रतिष्ठा घालविली’
खासदार जाधव पुढे म्हणाले की, निवडणुका ग्रामपंचायतीच्या असो पंचायत समिती असो की जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कोणत्याही स्वतःच्या घरचा मेहनतीचा पैसा खर्च करून कोणीही निवडणूक लढवत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या पैशाची गरज निर्माण होऊ लागली आहे. निवडणुकीत लावलेला पैसा कसा काढायचा या चिंतेमुळे लोकप्रतिनिधींवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. ठेकेदांनी सदस्यत्वाची प्रतिष्ठा घालविली. आपल्याला मोठ्या अपेक्षांनी जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन ॲड. नाझेर काझी यांनी यावेळी केले.

सर्वांच्या समन्वयातून जनतेच्या कामांना प्राधान्य ः मनीषा पवार
जालिंदर बुधवत यांनी यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली झालेली कोंडी आणि त्यानंतर अनेकांकडून आपल्यावर झालेला टीकेचा भडिमार याबाबत चर्चा केली. अध्यक्षा मनीषा पवार यांनी यावेळी बोलताना आपण सर्वांच्या समन्वयातून सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी कामकाज करीत असताना पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना या महा विकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


खुर्चीची परतफेड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निर्णय डॉ. राजेंद्र शिंगणे घेतात हे सर्वांनाच माहीत आहे. रियाज खान पठाण यांना सभापती पदाची खुर्ची देण्याचा निर्णय डॉ. शिंगणे यांचा होता. आजच्या पदग्रहण कार्यक्रमात डॉ. शिंगणे यांच्या अर्धांगिनी रजनीताई आल्या. त्यावेळी व्यासपीठावर खुर्ची नव्हती. परंतु सभापती रियाज खान पठाण यांनी चालत जाऊन खुर्ची उचलून आणली. यातून परतफेडीची जाणीव दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com