यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनकच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली अरहे. अशातच सोमवारी (ता. 15) तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासन यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच सोमवारी रात्रीच दारव्हातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्व जण सुरुवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील आहेत.
गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नेर आणि दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सोमवारी रात्री दारव्हातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 43 झाली आहे. आतापर्यंत एकूण 195 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सहा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोरोना डायरीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार रुग्ण अगदी शेवटच्या क्षणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच दोन जण वैद्यकीय महाविद्यालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी खाजगी रुग्णालयात कोणताही वेळ न घालवता कोव्हिड रुग्णालयात भरती व्हावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येतील.
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व मृत्यूची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी बाजार किंवा इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गेल्यास सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करावा. साबणाने स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा. ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, शंभर अंशापेक्षा जास्त ताप, नियमित खोकला असेल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नजीकच्या कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर, कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल व्हावे. खासगी रुग्णालयात वेळ न घालवता ग्रामस्तरावरील किंवा तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेसोबत संपर्क करून शासकीय रुग्णालयात भरती व्हावे. वरील लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकाने स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नये.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यःस्थितीत 32 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 39 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून, यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत; तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
डॉक्टरांना उपचाराची संधी द्या
वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांचा जीव वाचवित आहेत. आतापर्यंत तीन रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून काढून डॉक्टरांनी बरे केले आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांनी वेळेत भरती होऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना उपचाराची संधी द्यावी. तसेच कोरोना ही एक संधी माणून नागरिकांनीसुद्धा यापुढे आपली जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर घरीच नियमित 30 मिनिटे व्यायाम व योगा करा.
- एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.