प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल; रानभाज्यांच्या शेतीतून सुदृढ आरोग्याचा संदेश

farmer do experiments by farming traditional vegetables
farmer do experiments by farming traditional vegetables

अमरावती ः मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी निसर्गानेच खास रानभाज्या तयार केल्या आहेत. बहुतांश लोकांना रानभाज्यांची ओळख नसल्याने ते या लाभापासून वंचित आहेत. परंतु जिल्ह्यातील शेतकरी दिनकर कानतोडे यांनी रानभाज्यांची शेती करून या भाज्यांचे महत्त्व सर्वत्र पोहोचविण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे, या भाज्या बदलत्या ऋतुमानाप्रमाणेच येत असल्याने त्याचे खास वेळापत्रक त्यांनी तयार केले असून वर्षभर त्यांचा प्रयोग सुरूच असतो.

कोविड-१९च्या काळात निरोगी जीवनशैली कसी जगता येईल, याकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. त्यासाठी व्यायामासोबतच डाएटला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. काय खावे, काय खाऊ नये याचे प्रत्येकाने वेळापत्रक तयार केलेले आहे. मात्र प्रत्यक्षात निसर्गाचे देणे असलेल्या रानभाज्यांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही. 

दिनकर कानतोडे हे अमरावतीच्या यशोदानगर भागात राहतात. अंजनगावबारीजवळच उदखेड पार्डी या गावात साडेतीन एकर त्यांची शेती आहे. त्या शेताच्या धुऱ्यावर रानभाज्या आहेत, तर शेतात त्यांनी काळी तुळस, गवती चहा, अडुळसा यासह अन्य औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. विशेष म्हणजे, दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या पालेभाज्यांचीसुद्धा ते पेरणी करतात. 

रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असून अनेक विकारांवर त्या गुणकारी ठरतात, असा दावा श्री. कानतोडे यांनी केला आहे. अट मात्र एकच ती म्हणजे निसर्ग चक्रानुसार त्यांचे सेवन केले पाहिजे. त्यानुसार पहिला पाऊस आला की साधारणपणे ५ जून ते ३० जूनपर्यंतच्या काळात तरोट्याची भाजी खाणे उपयोगी ठरते. या कालावधीत किमान पाच ते सात वेळा तरोट्याची भाजी खाण्यात आलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच मधुमेहाच्या नियंत्रणासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. 

१ जुलै ते १६ जुलैपर्यंतच्या काळात किमान चार ते पाच वेळा तरी कटुल्याचा आहारात समावेश झालाच पाहिजे. या काळात ज्युतीच्या फुलांची भाजी खाल्ली पाहिजे. कटुले हे कॅंसर अवरोधक मानले जातात. सहसा कॅंसरपासून बचावासाठी त्याचा उपयोग केला जातो, असे कानतोडे यांनी सांगितले. या वेळापत्रकानुसार १६ जुलै ते १६ ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत बांबूच्या रोपट्याचे वडे, भजे, लोणचे आदींचे सेवन करावे, यासोबतच संत्री व मोसंबीच्या संयुक्त बिजांतून तयार होणारे पपनससुद्धा त्यांच्या शेतात घेतले जाते. 

यासोबतच कुंजऱ्याची भाजी, करेलकोसला या रानभाज्यांचा आहारात समावेश केला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आयुर्वेदाला मानणारे तसेच आजारापासून मुक्तता हवी, अशी इच्छा असणाऱ्यांना ते मोफत रानभाज्यांबाबत मार्गदर्शन करतात. तसेच त्या उपलब्धसुद्धा करून देतात.

कुटुंबीयांचे आरोग्य अबाधित

रानभाज्यांचा नियमित वापर केल्यामुळे आपले व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य अबाधित आहे. आपल्या कुटुंबात कुणालाही आतापर्यंत मोठा आजार झालेला नाही. दवाखान्याचे सहसा काम पडत नाही. भाजीबाजारात तर अपवादानेच जातो, अशी माहिती दिनकर कानतोडे यांनी दिली.

५० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल

रानभाज्या या अमृतासमान असून सर्वसामान्यांनीसुद्धा त्याची माहिती घेऊन राजभाज्यांचा नियमित आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. त्या उद्देशाने मध्यंतरी अमरावती येथे आयोजित रानभाजी महोत्सवात दिनकर कानतोडे यांनी जवळपास ५० ते ६० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com