महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पास हवाय निधी; अधिवेशनात नाराजी

जिगाव प्रकल्प.
जिगाव प्रकल्प.

नांदुरा (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यात पूर्णा नदीवर जिगाव येथे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प साकारला जात असून, शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, निधी अभावी हा प्रकल्प रखडत चालला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या प्रकल्पास बांधकाम, भूसंपादन व पुनर्वसन तसेच इतर बाबीसाठी एक हजार 100 कोटी रुपयांची आवश्यकता असताना निम्मेपेक्षाही कमी निधीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्थानिक आमदार राजेश एकडे यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळावा व येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा अनुशेष भरून निघावा यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहे.

प्रशासकीय बाबतीत रखडला प्रकल्प
नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीवरील जिगाव येथे साकारणाऱ्या या प्रकल्पाला प्रथम प्रशासकीय मान्यता ही 3 जानेवारी 1996 रोजी देण्यात आली. त्यावेळेस या प्रकल्पाची किंमत केवळ चार हजार 44 कोटी रुपये एवढी होती. कालांतराने प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी रखडत गेला व आजरोजी त्याची किंमत 13 हजार 744 कोटींवर पोहचली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. पुनर्वसन व भूसंपादनाच्या कारणासह वाढीव मोबदल्याच्या प्रशासकीय बाबतीत रखडला गेल्याने हा प्रकल्प लवकर साकारण्याच्या आशेवर आजतरी पाणी फेरले आहे. या प्रकल्पातून बुलडाणा जिल्ह्यातील 268 व अकोला जिल्ह्यातील 19 अशा एकूण २८७ गावाच्या एक लाख एक हजार 88 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे.

शारनाप्रती आहे नाराजी
या प्रकल्पाअंतर्गत 32 गावे पूर्णतः तर 15 गावे गावठानसह अंशतः अशी एकूण जवळपास 120 गावे बाधित झाली आहेत. या धरणाची लांबी आठ हजार 240 मीटर असून, संकल्पित जलसाठा 736.57 दलघमी आहे. या प्रकल्पातून 27 हजार 600 लोकसंख्या बाधित होणार असताना 25 वर्षांची एक पीढी ही सिंचनापासून सतत प्रकल्प रखडत गेल्याने वंचित राहिली आहे. सिंचनाचा फायदा होणाऱ्या या भागात पहिलेच खारपान पट्याचे लोन पसरले असल्याने अनेकांना किडणीसारख्या आजारातून बलिदान द्यावे लागले आहे. अनेक गावे पाणी टंचाईने सतत बाधित असतानाही अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत हा प्रकल्प रखडल्या गेल्याने शासनाप्रती प्रचंड नाराजी या भागात पसरली आहे. यासाठी प्रशासनाने प्रकल्पासंबंधिच्या सर्व बाबीची पूर्तता करण्यासाठी पाऊले उचलावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांसह प्रकल्पबाधित नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू
या मतदारसंघातीलच नव्हे तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा सिंचनाचा विषय असल्याने या प्रकल्पाकडे आमदार झालो तेंव्हापासूनच लक्ष ठेऊन असून, अधिवेशन काळात प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त निधी या प्रकल्पाला कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला आहे. लवकरच प्रकल्प पूर्ण कसा होईल यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
-राजेश एकडे, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com