सोशल मीडिया बंदी कायदा रोखणार : शरद पवार

shrad pawar
shrad pawar

नागपूर : केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयककानंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचा निर्धार केला आहे. हा कायदा सर्वसामान्य भारतीयांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने या कायद्याला रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे केली. 

विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना शरद पवार तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असून आज 'देवगिरी' या अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समस्यांसह महाविकास आघाडी या विषयांवर दिलखुलास संवाद साधला. 

मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना त्यांना विरोध होणार नाही, अशी अपेक्षा केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या या दाव्याला देशभरातील तरुणांनी छेद दिला असून जो निषेधाचा सूर या कायद्याविरोधात उभा राहिला आहे, तो निश्‍चितच पुढील सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल, असा आशावाद शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकार आता सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले हा कायदा म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे, अशी टीका करत या कायद्याला रोखण्यासाठी देशभरातून भाजप विरोधी सर्व पक्षांची ठोस भूमिका बांधून त्याविरोधात लढा उभारावा लागेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण सक्षमतेने या संघर्षात उतरेल, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला. 

देशभरातील तरुणाई विरोध करेल 
सोशल मीडिया बंदी कायदा म्हणजे भारतीयांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी असून खाजगी जीवनावर सरकारचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले. या कायद्याविरोधात देशभरातील तरुणाई अत्यंत संतापाने विरोध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. काही कारणास्तव सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा अंतिम उपाय नाही आणि असा प्रयत्न सरकारने केला तर या सरकारच्या विरोधात देशभरातील भाजप विरोधी शक्ती खंबीरपणे उभ्या राहतील, असा इशारा पवार यांनी दिला. 

सध्या देशातील अनेक विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी तरुणांनी जहाल निदर्शने सुरू केली आहेत. याचा दाखला देत पवार म्हणाले की, 1977 साली देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन कॉंग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरूणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतर करूनच झाला. त्यामुळे सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण हे आगामी काळात सत्तांतराची दिशा होऊ शकते, असा विश्वास शरद पवार यांनी स्पष्ट केला. यावेळभ महाविकास आघाडी सरकारच्या समन्वयाबाबत शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. 

महाविकास आघाडीचे लक्ष्य आता स्थानिक स्वराज्य संस्था 
शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडी च्या संदर्भात बोलताना पवार म्हणाले की अपेक्षेअगोदर ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांत पर्यंत पोहोचलेली आहे. मंगळवारी पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती.

यावेळी आगामी निवडणुकांत तिन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांनी बसून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पद वाटपाची सकारात्मक बोलणी करावी आणि त्यादृष्टीने सत्ता स्थापन कराव्यात, अशी सूचना पवार यांनी केली. त्यावेळी बहुतांशी आमदारांकडून याबाबतची कार्यवाही अगोदरच सुरू झाली असून शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये बैठका झाल्या असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com