मानोरा (जि. वाशीम) : वीज बिलातील चुकांच्या बाबतीत विक्रमावर विक्रम करीत असलेल्या महावितरण कंपनीचा नवीन प्रताप पुढे आला आहे. कंपनीने एका ग्राहकाचे वीज मीटर जानेवारीत काढून नेले पण, त्या ग्राहकाला दर महिन्याला बिल पाठवले जात आहे. त्या ग्राहकास अद्याप सिक्युरिटी डिपॉझिट मिळाले नाही. उलट त्याला वीज बिलांना तोंड द्यावे लागत आहे.
गणेश भाटू राठोड असे ग्राहकाचे नाव आहे. वीज मीटर परत करणाऱ्या अनेक ग्राहकांना गणेश राठोड यांच्यासारखा मनस्ताप होत आहे. गणेश राठोड यांनी फुलउमरी येथे पिठगिरणी चालविण्यासाठी वीज कनेक्शन घेतले होते. मात्र, वीज बिल मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे राठोड यांनी चक्की विकली व ८ जानेवारीला त्यांचेकडे असलेल्या ७१५० रुपये वीजबिलाचा भरणा करून त्यांचेकडील कनेक्शन कमी करण्यासाठी अर्ज केला होता.
त्यानुसार वीज मीटर परत नेऊन वीज कनेक्शन कापण्यात आले. असे असताना गणेश राठोड यांना मे महिन्यात २४२० रुपयाचे बिल पाठविण्यात आले. त्यानंतर २५०० व २००० रुपयांचे बिल देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे विजेचा वापर केवळ ० युनिट दाखवण्यात आला आहे. महावितरणच्या या प्रतापामुळे गणेश राठोड त्रस्त झाले आहेत. त्यांनी यानंतर सुद्धा काही रक्कम भरल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले असून, पोहरादेवी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना, आधी वीज बिल भरा नंतर तक्रारीचे निराकरण करू व आपणास वीज मीटर देऊ असे सांगितले आहे.
"हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रकरणाची चौकशी केली जाईल. मीटर काढल्याची माहिती सिस्टीममध्ये फिड करण्यात आली नसेल. पुन्हा पोहरादेवी येथे ग्राहकाला अर्ज घेऊन अभियंता सहारकर यांचेकडे पाठवा, यापुढे बिल येणार नाही. ग्राहकाला नियमानुसार सिक्युरिटी डिपॉझिट परत केले जाईल. त्यासाठी पोर्टलवर अर्ज करता येतो."
- राजेंद्र श्रीरामे, अभियंता, उपविभागीय वीज वितरण कंपनी, मानोरा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.