खबरदार ! विनाकारण त्रास द्याल तर, गाठ माझ्याशी आहे, कोण म्हणाले असे?

रामटेकःतहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना आमदार जयस्वाल.
रामटेकःतहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना आमदार जयस्वाल.

रामटेक(जि.नागपूर) : कुठल्याही सरकारी कार्यालयात जा. कार्यालयातील निर्ढावलेली बाबूगिरी हमखास त्रास द्यायला टपलेली असते. एखादा निराधार क्षुल्लक काम घेऊन आला तरी त्याच्यावर ‘रॉब'झाडण्यात ही बाबूगिरी पटाईत असते. शेवटी बाबूगिरीचा शिकार झालेला या अधिकाऱ्यांना शिव्याशाप देत घरचा रस्ता पकडतो. असाच प्रकार रामटेक तहसील कार्यालयात घडला. कर्मचाऱ्यांच्या विषयी अनेक तक्रारी ऐकल्यानंतर आमदार ॲड.आशीष जयस्वाल यांनी कार्यालयात जाऊन एकेकाला चांगलेच फाईलीवर घेतले. त्यांचे हे रौद्ररूप पाहून अनेकांना आश्‍चर्यच वाटले.

अधिक वाचाः ‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा...

भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर
केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना तसेच विविध योजनेत अनेक वर्षांपासून घोळ सुरु आहे. पात्र लाभार्थ्याचे अर्ज नामंजूर करणे, नामंजूर झालेल्या प्रकरणात लाभार्थ्यांना त्रुटी न सांगणे, प्रकरण मंजूर, नामंजुरीबाबत अर्जदाराशी कुठलाही पत्र व्यवहार न करणे, अशा अनेक तक्रारींची शहानिशा करण्यासाठी रामटेक तहसील कार्यालयात आमदार जयस्वाल यांनी भेट दिली असता त्या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. लाभार्थ्यांना विशेषतः वृद्धांना विनाकारण त्रास दिल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदारांनी दिला.

नायब तहसीलदारही झाले निरूत्तर
आमदार आशीष जयस्वाल यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तहसिल कार्यालयातील कर्मचारी काहीतरी त्रृटी काढून त्रास देत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना पाठविलेल्या पत्रात त्रृटी कोणत्या, हे मात्र नमूद करण्यात आले नाही. अशा तक्रारी मोठ्या संख्येत प्राप्त होताच १ सप्टेंबरला आमदार जयस्वाल तहसील कार्यालयातील सामाजिक न्याय विभागाच्या कक्षात सरळ पोहोचले. त्यांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्यासमक्ष कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पुरावाच सादर केला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कर्मचारी आणि संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पाटील हे सुद्धा निरूत्तर झाले.

कार्यप्रणालीत सुधारणा करण्याबाबत निर्देश
आमदारांचे हे रौद्ररूप पाहून कर्मचारी गांगरून गेले. आमदारांनी तहसीलदारांनी या विभागाकडे जातीने लक्ष द्यावे व लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असा निर्देश दिला. सामाजिक न्याय विभागाच्या योजना संदर्भात अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले. यापुढे कुठल्याही प्रकरणात अर्जदारांना त्रास झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार अॅड.आशीष जयस्वाल यांनी  सुनावले.

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com