नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये राज्य सरकार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, शाळांमध्ये हजारो विद्यार्थी एकत्र येणार असल्याने "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाण्याची शक्यता कमी आहे. संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात विभागाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. शाळेत व वर्गांमध्येही एकावेळी शेकडोंची गर्दी होणार आहे. त्या परिस्थितीत "सोशल डिस्टन्सिंग' पाळणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अंतराने बसविल्यास शाळांमध्ये तेवढे बेंच व वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. शिवाय स्कूल बस, व्हॅन व ऑटोरिक्षांमध्ये गर्दी होऊ शकते.
अशावेळी एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास आजाराचा इतरत्र वेगाने फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रसंग ओढवल्यास त्यास कोण जबाबदार राहील, असा सवाल करीत त्यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत शाळा सुरू न करण्याची शासनाला विनंती केली. यावेळी नागेश राऊत, कृष्णा गावंडे, जगदीश गमे, मनीष वानखेडे, अरविंद क्षीरसागर, संजय मांगे, अज्जू खान आदी उपस्थित होते.
सध्या शाळांमधून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक गरीब व हातमजुरी करणारे आहेत. त्यांना स्मार्टफोन व लॅपटॅप खरेदी करणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू शकतात. यासंदर्भातही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.