सोहळा धम्मदीक्षेचा : ६४ वर्षांपूर्वी हॉटेल श्याममध्ये थांबले होते बाबासाहेब, निवासाचे बिल ११०० रुपये

dr babasaheb ambedkar lived in hotel shyam nagpur in 1956
dr babasaheb ambedkar lived in hotel shyam nagpur in 1956

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी दिलेल्या धम्मदीक्षेने पाच लाख आंबेडकरी जनतेचे आयुष्य उजळून निघाले. धम्मक्रांतीने दाही दिशा नवतेजाने प्रकाशमान झाल्या आणि या धम्मक्रांतीचे मूक साक्षीदार ठरलेले हॉटेल श्‍याम बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुनीत झाले. एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ दिवस बाबासाहेबांचा तो धम्मदीक्षेचा इतिहास या हॉटेलने अनुभवला. या धम्मदीक्षा सोहळ्याचे सूत्रधार असलेले धम्मसेवक वामनराव गोडबोले यांनी ६४ वर्षांपूर्वी या हॉटेलचे बिल ११०० रुपये अदा केले होते. धम्मदीक्षा सोहळ्यासाठी गोळा केलेल्या निधीतून ११०० रुपयांचे बिल हॉटेल मालक खेता यांच्या हातावर ठेवले होते. हॉटेल श्‍याम बुक करताना केवळ शंभर रुपये सुरुवातीला देण्यात आले होते. उर्वरित सारी रक्कम पुढे टप्प्याटप्प्याने देण्यात आली.

नागभूमीत ठरलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्‍टोबर १९५६ रोजी येणार होते. परंतु, हॉटेल श्‍याम ११ ऑक्‍टोबरपासून "बुक' करण्यात आले होते. यामुळे भारतीय बौद्धजन सोसायटीच्या कार्यकारिणीला आश्‍चर्य वाटत होते. बाबासाहेब ११ ऑक्‍टोबरला विमानतळावर पोहोचले. वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले, दशरथ पाटील, आकांत माटे यांच्यासह सहा जण बाबासाहेबांना विमानतळावरून आणण्यासाठी गेले होते. तब्बल दीड दिवस बाबासाहेब आल्याची खबरबात कोणालाच नव्हती. कर्नलबागचे प्रल्हाद मेंढे यांच्या नेतृत्वात अतिशय कडक सुरक्षाव्यवस्थेचे जाळे हॉटेल श्‍याम सभोवती विणले गेले होते. साध्या वेशातील समता सैनिक दलाचे गुप्तहेर सर्वत्र फिरत होते. दहा सैनिकांचे पथक त्यावेळी श्‍याम हॉटेलच्या दरवाजासमोर ठेवण्यात आले होते. यात सेनापती म्हणून के. व्ही. उमरे, तर स्वयंसेवक, सैनिकांमध्ये राम फुलझेले, एकनाथ गोडघाटे, संपत गोडघाटे, श्‍यामराव साळवे, दौलतराव पाटील, पांडुरंग हाडके, बाबूराव पाटील, लक्ष्मण, विश्‍वनाथ सावरकर यांचा समावेश होता.

हे सारे समता सैनिक दलाचे स्वयंसेवक डोळ्यांत तेल टाकून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्या सुरक्षायंत्रणेचा त्रास खुद्द बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनाही झाला. परंतु, बाबासाहेबांना विचारल्याशिवाय चिटपाखरूही भेटण्यासाठी बाबासाहेबांच्या खोलीत शिरत नव्हते. यामुळे अनेकांनी या सुरक्षायंत्रणेची तक्रारही केली होती. सहा-सहा तासानंतर समता सैनिक दलाचे सैनिक बदलत असल्याच्या आठवणीला वामनराव गोडबोले यांचे पुतणे शेखर गोडबोले यांनी उजाळा दिला.

खोली क्रमांक ११६ -
धम्मदीक्षा सोहळ्यात बाबासाहेब आणि माईसाहेब हॉटेल श्‍याममधील ११६ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. भन्ते महास्थवीर चंद्रमणी ११८ क्रमांकाच्या खोलीत थांबले. यानंतर भन्ते संघरत्न, भन्ते प्रज्ञानंद, भन्ते सदतिस्स, भन्ते पय्यातिस्स येथे आले होते. बाबासाहेबांचे अतिशय जवळचे नानकचंद रत्तू ११९ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. याशिवाय बाबासाहेबांचे संगीत शिक्षक भालचंद्र पेंढारकर, देवप्रियवली सिन्हा, वराळे गुरुजी, बाळू कबीर आदी सारी मंडळी याच हॉटेलमध्ये थांबली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com