नागपूर : केवळ पक्ष, संघटन येवढाच विचार करून चालणार नाही. नागरिकांची कामे करण्यासाठी सत्ता हवी असते. सत्ता असली की पक्षसुद्धा बळकट होतो. तेव्हा निवडणूक केंद्रीय पद्धतीने लढण्याची गरज आहे. भाजप त्याच पद्धतीने लढते. म्हणून त्यांच्या जास्त जागा निवडूण येतात. नाही तर भाजपचे अनेक खासदार असे आहेत, जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाही, असा टोला काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने हाणला.
भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची आतापर्यंत युती होती. त्यामुळे शिवसेना ४८ जागांवर उमेदवार देऊ शकत नव्हती. शिवसेनेत मी २७ वर्षे होतो. परंतु, युतीमुळे मला फार काही करता आले नाही. पुढे जाता आले नाही. शिवसेना वाढू नये, यासाठी भाजप सतत प्रयत्नरत असते. ज्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली. तेव्हा कुठे मी आमदार होऊ शकलो. युतीचा फायदा शिवसेनेला कधीच झाला नाही. आता शिवसेना वेगळी झाल्याने त्या पक्षाला फायदा होईन आणि कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल, असे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
निवडूण येण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन पक्षाची जागा गमावण्यात काही अर्थ नसतो. परंतु, मतदारसंघात चांगले काम असेल तर नेत्यांचा मुलगा, भाऊ, बायको किंवा इतर नातेवाईकाला उमेदवारी देण्यात काहीच हरकत नाही. काँग्रेसला लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या नवीन उमेदवारांना संधी द्यावी लागेल, असेही खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
मी शिवसेनेत कधीही नाराज नव्हतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे तेव्हाही चांगले संबंध होते आणि आजही आहेत. नाराजीमुळे मी शिवसेना सोडल्याचे बोलले जात होते. परंतु, नाराजीमुळे नव्हे तर राजकीय प्रगतीसाठी शिवसेना सोडली, असेही खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
काँग्रेसने पक्षात नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे. नवीन उमेदवार हे ७० टक्के असावे तर ३० टक्के जागा निष्ठावंतांना दिल्या गेल्या पाहिजे. जुनी रणनिती सोडून नवी धोरण पक्षाने अंगिकारल्यास लोकसभेत पक्षाच्या जागा निश्चितपणे वाढतील, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेसमध्ये मी संघटनेत काम करावे, असा सूर सुरुवातीला होता. परंतु, चंद्रपूर लोकसभा आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांवर लक्ष द्यायचे असल्याने ती जबाबबादारी मी नाकारली. केवळ पक्ष, संघटन येवढाच विचार करून चालणार नाही. कारण, लोकांची कामे करण्यासाठी सत्ता पाहिजे, सत्ता असली की पक्षसुद्धा बळकट होतो. यापुढील निवडणूक केंद्रीय पद्धतीने लढण्याची गरज आहे, असेही खासदार धानोरकर यांनी हाणला.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.