नागपूर : नागपूर शहरात दर दिवसाला 400 ते 500 रुग्णांना खाटांची गरज आहे. मात्र प्रशासन कोरोनाबाधितांना सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. खाटांअभावी रुग्णांचे रुग्णवाहिकेतच मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच खाट नसल्याचे सांगण्यात येत असल्याने गरीब रुग्ण परत घरी जात आहेत, अन घरीच मृत्यू पावत आहेत.
मागील चार दिवसांपूर्वी राज्य कामगार रुग्णालयात २०० खाटा वाढवण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात पाच दिवस उलटले. मात्र एक खाट वाढवले नाही. साधे अधिग्रहीत केल्याचे पत्र रुग्णालय प्रशासनाला मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. शनिवारी १७ एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी राज्य कामगार रुग्णालयाची पाहणी केली. येथे २०० खाटा वाढू शकतात, असे कळविण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाकडून अतिरिक्त खाटांसह ऑक्सिजन खाटा व इतर आवश्यक साहित्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या प्रशासनाने सादर केला. पाच दिवस उलटून गेले, मात्र त्यानंतर या रुग्णालयाकडे विचारणा नाही. प्रशासनाने साधे रुग्णालय अधिग्रहण केल्याचे प्रमाणपत्रही रुग्णालय प्रशासनाला पाठवले नसल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांसह सर्व मनुष्यबळ तैनात असताना पाच दिवस लोटून गेल्यानंतरही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे खाटा वाढण्यात आल्या नाही. यामुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. ऑक्टोबरमध्ये जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. मात्र ही ग्वाही फोल ठरली.
खाटा बघण्याचा कार्यक्रम पुरे झाला
शासकीय आयुर्वेद रुग्णालय, राज्य कामगार रुग्णालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद रुग्णालय असे केवळ रुग्णालये पाहण्याचा आणि खाटा वाढवण्यात येत असल्याच्या घोषणांचा कार्यक्रम पुरे झाला. केवळ मेयो, मेडिकल, एम्समध्ये ज्या खाटा आहेत, त्यांच्याच भरवशावर कोरोना उपचाराचा देखावा करण्यात येत आहे. केवळ रुग्णालयाची पाहणी करून कागदी घोडे रंगवण्यात अर्थ नाही, अशी टीका समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तर मारे म्हणाले.
आठ महिन्यांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामगार रुग्णालय कोविड सेंटर तयार करण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांची बदली झाली. यानंतर कोरोनाची लाट ओसरली. मात्र दोन महिन्यात दुसरी लाट आली. कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोनाबाधितांना खाट उपलब्ध होत नाही. प्रशासन पाच दिवसानंतरही ढिम्म आहे. आज नागपुरात मनपा आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे असते तर कागदी घोडे नाचवण्यापेक्षा नागपुरात तीन हजार खाटांची सोय झाली असती. असेही समता सैनिक दलाचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.