नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही ‘स्वाधार’ योजना लागू केली तर हजारो गरीब, वंचित ओबीसी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. एवढेच नव्हे तर राज्य सरकारवर खर्चाचा मोठा भार येणार नाही, अशी योजना महात्मा फुले समता परिषदेने तयार केली आहे. राज्यात मंत्री असलेले छगन भुजबळ हे समता परिषदेचे अध्यक्ष आहे. त्यामुळे ही योजना लागू होण्याची मोठी शक्यता आहे.
अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्यांना भाड्याने राहता यावे यासाठी निर्वाह भत्ता देण्याची योजना राज्य सरकारने १७ जून २०१८ ला सुरू केली. या योजनेचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ असे नामकरण झाले. त्यानुसार अनुसूचित जातीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी निर्वाह भत्ता म्हणून साठ हजार रुपये देण्यात येतात.
पुढे अशीच योजना अनुसूचित जमाती, मराठा समाज आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. याच धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही संपूर्ण योजनेचा आराखडा ज्येष्ठ ओबीसी अभ्यासक आणि विचारवंत प्रा. दिवाकर गमे यांनी तयार केला आहे. गुरुवारी (ता. १५) छगन भुजबळ यांच्या वाढदिवशी ही योजना त्यांच्यापुढे सादर करून अमंलबजावणी करण्याची मागणी करणार आहेत.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर निवासी वसतीगृहे सुरू करा, असे निर्देश २००४ साली केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिले होते. परंतु, तेव्हापासून राज्य सरकारने यावर निर्णय घेतला नाही. गेल्या वर्षी मात्र दोनशेच्या मर्यादेपर्यंत वसतीगृह सुरू करण्याची योजना सरकारने जाहीर केली. परंतु अजून अंमलबजावणी झाली नाही. गरीब, वंचित, शेतकरीपुत्रांसाठी वसतीगृहेही नाहीत. निदान `स्वाधार` योजना सुरू करणे शक्य आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि परतावा यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आणि विकास समिती (डीपीडीसी)च्या माध्यमातून निधी दिला जात होता. परंतु, २०१७-१८ या वर्षापासून `डीबीटी`पद्धत सरकारने सुरू केली. त्यामुळे `डीपीडीसी`च्या अंदाजपत्रकातून हे `हेड` कमी झाले. प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी यावर अंदाजे सरासरी पाच कोटी रुपये खर्च व्हायचे. पुन्हा या हेडचा समावेश केला तर ओबीसी `स्वाधार` योजनेसाठी लागणारी रक्कम आपोआप संबंधित जिल्ह्यांमध्ये विभागली जाईल. राज्य सरकारला कोणताही मोठा भुर्दंड बसणार नाही.
अशी असावी योजना
अंदाजे आवश्यक निधी
शिक्षणाअभावी अनेक पिढ्या बरबाद झाल्या
ओबीसींमधील गरीब, वंचित, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना दहावीपुढील शिक्षणाचा भरसमाठ खर्च पेलवणारा नसतो. त्यामुळे शिक्षणाअभावी अनेक पिढ्या बरबाद झाल्या. ‘हींग लगे न फिटकरी’, अशी योजना आम्ही तयार केली आहे. ती लागू केली तर ओबीसींमधील गरीब विद्यार्थी उत्तमोत्तम शिक्षण घेऊ शकतील.
- प्रा. दिवाकर गमे
विभागीय अध्यक्ष, नागपूर, समता परिषद
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.