सिरोंचातील नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती नाहीच; धोकादायक परिस्थितीतही नियमांचं सर्रास उल्लंघन

People are not following corona rules in Sironcha
People are not following corona rules in Sironcha

सिरोंचा (जि. गडचिरोली) : मागील वर्षी मार्च 2020 मध्ये चीनमधून अचानक आलेल्या कोरोना विषाणूने नकळत भारतातील काही राज्यांत शिरकाव केला. बघता -बघता या विषाणूने संपूर्ण भारतात आपले जाळे पसरवले. नववर्ष 2021 मध्ये कोरोनाचा भर ओसरत असताना आता पुन्हा त्याने डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रशासन सावध झाले असले, तरी सिरोंचातील नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे येथे रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे

राज्य सरकारने याबाबत दखल घेऊन नागरिकांना शारीरिक अंतर पाळणे, विनाकारण घरा बाहेर पडू नये, मास्क वापर करण्याची सक्ती करण्यात आली. लॉकडाऊन व संचारबंदी काळात तालुक्‍यातील नागरिकांनी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तेलंगणा राज्याच्या सीमेवर तसेच प्राणहिता नदीवरील पुलावर कठडे लावून परराज्यातील नागरिकांना महाराष्ट्र राज्यात शिरकाव करण्यास मनाई करण्यात आली होती. कोरोना विषाणूंची लागण झालेल्या व्यक्तींना क्‍वारंटाईन करत उपचार केंद्र तालुक्‍यातील विविध ठिकाणी उभारण्यात आले होते. दर सोमवारी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले होते. 

विना मास्क बिनधास्त फिरणाऱ्या व्यक्तींना नगरपंचायतीने दंड ठोठावण्यास सुरुवात केली होती. पण काही दिवसांनी परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असतानाच अचानक परत एकदा या फेब्रुवारी महिन्यात अचानक कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढल्यावर शासनाने पुन्हा एकदा नागरिकांना काळजी घ्यावी, विनामास्क बाहेर फिरायला मनाई आदेश दिला आहे. तसेच किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांना शारीरिक अंतर व मास्कबाबत सक्ती करण्यात आली आहे. विनामास्क वापर करीत असलेल्यांना किराणा देण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. 

या बाबतीत संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक पातळीवर तहसीलदार, नगरपंचायत, पोलिस विभाग यांच्याकडे देण्यात आली असली तरी तालुक्‍यातील नागरिकांना या बाबतीत काहीही घेणे देणे नाही, असे सध्या सर्वत्र दिसून येत आहे. बरेच नागरिक कारवाई होत नसल्याचे बघून विनामास्क फिरत असताना दिसून येत आहेत. तसेच किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते ग्राहकांना शारीरिक अंतर न पाळता हवी असलेली वस्तू देत आहेत. 

नागरिकसुद्धा अंतराच्या नियमाचा फज्जा उडवत असून तेलंगणा राज्याच्या वरंगल, चेन्नूर व इतर गावातील नागरिक सिरोंचा तालुक्‍यात बसने रोजच मोठ्या प्रमाणात दखल होत आहेत. तसेच धार्मिक स्थळे व लग्न समारंभ या ठिकाणीसुद्धा शारीरिक अंतर न पाळता, मास्कचा वापर न करता नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असताना प्रशासनाने या सर्व बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुक्‍यात लवकरच करोना विषाणू पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

दंडात्मक कारवाई सुरू....

कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत 15 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी तहसीलदार सय्यद हमीद यांच्या मार्गदर्शनात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विशाल पाटील नगरपंचायतीच्या कर्मचारी नी केली आहे. मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी नागरिकांना विना मास्क वापर न करता बाहेर फिरण्याची मनाई केली असून आवश्‍यक असले तरच घरा बाहेर पडण्याचे आव्हान केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com