जंगलातील वणवा रोखण्यात गब्बरसिंग आणि सिंघम फेल; व्याघ्रप्रकल्पात आगीचे प्रकार सुरूच

posters of Singham and Gabbarsingh are failed to stop fire forest in Melghat
posters of Singham and Gabbarsingh are failed to stop fire forest in Melghat

अचलपूर (जि. अमरावती) :  मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले होते. मात्र मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षणासाठी मैदानात उतरलेले गब्बरसिंग आणि सिंघम दोघेही अपयशी ठरल्याचे खोंगडा वर्तुळात लागलेल्या आगीवरून दिसून येत आहे. या परिसरात जवळपास तीस हेक्‍टरांवर वन जळून खाक झाले आहे. त्यामुळे गब्बरसिंग, सिंघम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने आदिवासी पाड्यांच्या दर्शनी भागावर संरक्षणार्थ शोले सिनेमातील गब्बरसिंग व ठाणेदार सिंघमचे फलक लावण्यात आले होते. ते पोस्टर सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. त्यामुळे ते पोस्टर चांगलेच चर्चेत आले होते. 

गब्बर आणि सिंघममुळे आग लागण्याचे प्रकार कमी होतील, या उद्देशानेच हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र सिंघम आणि गब्बर दोघेही आगीच्या घटनेवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत. दरवर्षी मेळघाटच्या जंगलात आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. त्यामध्ये हजारो हेक्‍टर जंगलाची राखरांगोळी होते. शिवाय साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरीण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांना जीव वाचवित सैरभर पळावे लागते. या आगीत प्राण्यांचा होरपळून मृत्यूसुद्धा होतो. 

ही आग वन्यप्राण्यांसह मेळघाटच्या घनदाट अरण्याची राखरांगोळी करणारी ठरत असून कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी बांबूंच्या घर्षणाने उन्हाळ्यात आग लागत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र आग मानवनिर्मित असल्याचे सत्य आहे. वन आणि व्याघ्रप्रकल्प त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. 

त्याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर शोले चित्रपटातील गब्बरसिंग यांचा प्रसिद्ध डायलॉग "अरे ओ सांभा, जंगल मे आग लगाने पे सरकार कितना जुमार्ना रखे है, सरदार पुरे पाच हजार' और दो साल की जेल', तर सिंघममधील अजय देवगनचा डॉयलाग "आली रे आली, आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली', अशा आशयाचे पोस्टर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने सोशल मीडियावर अपलोड केले होते. यामुळे आतातरी जंगलात आग लागण्याच्या घटनेला आळा बसेल असे वाटत होते. मात्र हे दोघेही आग लावण्याच्या घटनेला अंकुश बसवू शकले नाहीत. आजही मेळघाटच्या जंगलात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com