राजे अमरीशराव आत्रामांचा पराभव आणि लोहखनिज उत्खनन; काय आहे संबंध?

Raje-Ambrishrao-Aatram
Raje-Ambrishrao-Aatram

एटापल्ली : गेल्या चार वर्षांपासून सूरजागड पहाड़ीवरून लोहखनिजाचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील उद्योगाला याचा पुरवठा केला जात असताना 16 जानेवारी 2019 रोजी लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले होते. यामुळे संतप्त जमावाने कंपनीच्या पंधरा ट्रकांना आग लावत त्याची राखरांगोळी केली होती.

तसेच लोहखनिज उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने लोहखनिज उत्खनन आणि वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून लोहखनिज उत्खनन आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, उत्खनन सुरू करण्याच्या हालचाली कंपनीकडून अनेकवेळा करण्यात आल्या. मात्र, जनतेचा विरोध एप्रिल 2019च्या लोकसभा निवडणुका आणि सततच्या पावसामुळे लोहखनिजाचे उत्खनन कंपनीला करता आले नाही. मात्र, भाजप उमेदवार राजे अमरीश आत्राम यांच्या प्रचारार्थ 18 ऑक्टोबरल आलापल्ली येथील हॉकी ग्राउंडवर झालेल्या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली. त्यांनी सूरजागड लोहखनिज प्रकल्प तत्काळ सुरू केला जाईल, अशी घोषणा भाषणावेळी केली होती. 

त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांचे पारडे जड होण्यात झाला. धर्मरावबाबा यांना ग्रामसभा, आदिवासी समाजबांधव आणि इतर मतदारांचा पाठिंबा वाढला. लोहखनिज उत्खनन कामावरील मजूर आणि कर्मचारीही धर्मरावबाबा यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिेले. निवडणुकीच्या प्रचारातही हे सर्व कामगार उतरल्याचे दिसून आले होते, हे विशेष. 

वादग्रस्त सुरजागड पहाड़ीवरून होणारे लोहखनिजाचे उत्खनन, पर्यावरण आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याची मागणी पुढे करून लॉयलड्स मेटल्स कंपनीकडून पोलिस बंदोबस्तात होणारे लोहखनीज उत्खनन आणि त्याला असणारा आमदार राजे अमरीशराव आत्राम आणि सत्ताधारी भाजपचा पाठिंबा आणि त्याला एटापल्ली आणि भामरागड तालुक्यांच्या नागरिकांकडून होत असलेला विरोध या सर्व गोष्टी अमरीश आत्राम यांच्या पराभवास कारणीभूत आहेत. 

तालुक्यातील मतदारांनी राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना कौल दिल्याने त्यांना घवघवीत यश मिळाले असून भाजप उमेदवार राजे अमरीश यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे.

सूरजागड लोहखनिज उत्खनन आणि वाहतुकीला ग्रामसभा, आदिवासी समाज आणि इतर नागरिकांनी केलेल्या विरोधामुळेच राजे अमरीशरावांचा पराभव झाल्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com