अकोला : बार्शीटाकळी तालुक्याचा दौरा आटोपून अकोल्यात पोहोचलो व दुसऱ्या दिवशी सकाळीच अकोल्याहून २५ किलोमीटरवर असलेल्या बाळापूरच्या दिशेने ‘मार्गस्थ’ झालो. चार किलोमीटरचा प्रवास करीत बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावात (Ridhora village) प्रवेश केला. तिथे ‘सकाळ’चे बाळापूर तालुका बातमीदार अनिल दंदी यांनी बसथांब्यावर स्वागत केले. त्यांच्यासोबत ‘सकाळ’चे देगाव येथील बातमीदार उमेश मैसने होते. (Roads have not been constructed in Balapur taluka for two years)
गावातील ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत पाहून जरा बरे वाटले. रिधोरा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संजय अघडते व उपसरपंच गणेश वाडकर यांनी स्वागत केले. गावातील शेतरस्त्यांची पाहणी केली. रस्त्यावरील काटेरी झुडपे तोडण्याची कामे सुरू होती. तालुक्यातील बिकट रस्त्यांबाबत अनिल दंदी यांनी माहिती दिली होतीच. त्यामुळे आम्ही रिधोरा-देगावमार्गे वाडेगावकडे निघालो. देगावपर्यंत रस्ता बरा वाटला. मात्र त्यानंतरच्या रस्त्याने धड पायी चालताही येत नव्हते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बाळापूर येथील किल्ला व राजा जयसिंग यांची छत्री पर्यटकांसाठी कायम उत्सुकतेचा विषय आहे. मन व मस नदी काठावर वसलेले बाळापूर शहर धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या वारसास्थळामुळे बाळापूरची देशभर ख्याती; मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जगभर नाचक्की अशी स्थिती आहे.
खड्डेच खड्डे चोहीकडे; रस्ते गेले कुणीकडे!
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील व गावातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: दैना झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले मोठमोठेे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील वाडेगाव-देगाव, खिरपुरी, मोरगाव सादीजन, हसनापूर, डोंगरगाव या मुख्य मार्गाची अवस्था दयनीय आहे. दरवर्षी डांबरीकरणाच्या नावाखाली निकृष्ट काम करून लाखो रुपये लाटले जातात. बाळापूर शहरासह देगाव, खिरपुरी, रिधोरा, निमकर्दा, खंडाळा, मोरगाव, टाकळी, कारंजा आदी गावांतील रस्तेही नादुरुस्त आहेत.
दोन कंपन्यांना कंत्राट, तरी रखडले पालखी मार्गाचे काम
शेगाव-किनगाव जट्टू व पुढे पंढरपूरकडे जाणाऱ्या या पालखी मार्गाचे काम तीन वर्षांपासून सुरूच आहे. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्याला जोडणाऱ्या या ८२ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट सुरुवातीला सुधीर कन्स्ट्रक्शन व आता ‘गो अहेड इन्फ्रा’ कंपनीला दिले आहे. हे काम तब्बल ३७१ कोटींचे आहे. यातील केवळ दहा टक्के काम झाले असून, कंपनीने ७०.४९ कोटी रुपयांचा खर्च या कामावर केला.
विद्युत केंद्राच्या राख वाहतुकीने रस्त्यांची चाळण
पारस औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखडीच्या सततच्या वाहतुकीमुळे मनारखेड रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पारस औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखडीची वाहतूक मनारखेड, कोळासा मार्गावरून केली जाते. खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Roads have not been constructed in Balapur taluka for two years
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.