धक्कादायकः आदेश देऊनही भूमकावर गुन्हा दाखल झालाच नाही!

file photo
file photo
Updated on

अचलपूर(अमरावती) ः  मेळघाटात अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून लवादा गावातील एका दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर चटके दिल्याचा संतापजनक प्रकार ‘सकाळ’ने ३० ऑगस्ट रोजी उजेडात आणला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकाला आता पुढील उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भूमकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र सलोना अंतर्गत येत असलेल्या लवादा गावातील दिवेश राजू अखंडे या दोन वर्षीय बालकाच्या पोटावर गरम विळ्याने संपूर्ण पोटावर चटके (डंबा) दिल्याने त्याची प्रकृती बिघडली होती, परिणामी आरोग्य विभागाच्या वतीने बालकाला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता. तीन) शहरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ त्याला हलविण्यात आले आहे. त्याठिकाणी त्या बालकावर उपचार सुरू केले आहेत. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. 


दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी चिखलदरा येथील डॉ. सतीश प्रधान यांना सदर बालकाच्या पोटावर चटके देणाऱ्या भूमकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापपर्यंत भूमकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मेळघाटात दरवर्षी डंबा देण्याचे प्रकार घडतात. यावर्षी तर तीन महिन्यांतच तीन घटना घडल्या आहेत. या वारंवार घडत असलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी भूमकावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र भूमकावर बहुतेक वेळा कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मेळघाटात चटके देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परिणामी अनेक चिमुकले या चटक्‍याला बळी पडत असल्याचे दरवर्षी दिसून येते.

पोटावर चटके दिलेल्या लवादा येथील बालकाला गुरुवारी (ता. तीन) सकाळी शहरातील एका खासगी बालरोग रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या बालकाची प्रकृती ठीक आहे. चटके दिलेल्या बालकाच्या संबंधित सोशल मीडियावर चुकीची माहिती देण्यात येत आहे.
-डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

भूमकावर गुन्हा दाखल केल्याने काही फरक पडणार नाही. यासाठी मेळघाटात वारंवार अशा घटना का घडतात, याची शहानिशा करणे आवश्‍यक आहे.  त्यासाठी गावोगावी समूपदेशन करणे गरजेचे आहे, जेणेकरून आदिवासींमध्ये जागृत्तता निर्माण होईल आणि डंबासारख्या घटना घडणार नाही.
-बंड्या साने, संस्थापक, खोज.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com