अमरावती : विदर्भात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरूच आहे. नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून येऊ लागले. यवतमाळ व अमरावतीत नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात जास्त खटकणारी बाब म्हणजे सर्वाधित मृत्यू अमरावती जिल्ह्यात झाले आहेत. मात्र, येथे बाधितांची संख्या नागपूरच्या तुलनेत खूप कमी आहे. शनिवारी अमरावतीत एकाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांचा आकडा बारा झाला आहे.
अमरावती शहरात कोरोनामुळे शनिवारी (ता. 9) सकाळी कोविड-रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती स्थानिक मसानगंज येथील रहिवासी होता. त्याला सर्दी, ताप व खोकला असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्याने तेथून गुरुवारी त्याला कोविड-रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.
त्याच्यासह हैदरपुरा येथील 36 वर्षीय व्यक्तीचा नमुना शुक्रवारी (ता. 8) पॉझिटिव्ह आला. त्यावरून एक दिवसाचा अवधी उलटत नाही तोच मसनगंज येथील 53 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 12 झालेली आहे. संबंधित 12 मृत्यू अनुक्रमे हाथीपुरा, कमेला ग्राउंड, हैदरपुरा, पाटीपुरा, तारखेडा, युसुफनगर, ताजनगर, कंवरनगर, शिराळा, खोलापुरीगेट, आझाद कॉलनी आणि मसानगंज येथील आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 78 वर पोहेचली आहे. त्यामध्ये 12 जणांचा मृत, 69 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच एकावर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. पाच व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहेत. नागपुरात सर्वाधिक रुग्ण असून, यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर असूनसुद्धा मृत्यूमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद 11 मार्च रोजी झाली. यानंतर विदर्भातील यवतमाळ, अमरावती हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. विदर्भात 11 मार्च रोजी 50 रुग्णांची नोंद झाली. तर 14 एप्रिलला 100 तर 27 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या 200 वर पोहोचली. प्रारंभी कोरोनाच्या तपासणीचा वेग कमी होता यामुळे बाधितांची संख्या मर्यादित होती. अलीकडे तपासणीचा वेग वाढला. त्यानुसार, अवघ्या 10 दिवसांत कोरोना विषाणूबाधितांची संख्या 500 वर पोहोचली आहे.
सध्या सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूर शहरात 269 रुग्णांची नोंद झाली आहे. यापाठोपाठ यवतमाळात 84 जण बाधित आढळले आहेत. अकोल्यात 113 तर अमरावतीमधील 78 झाल्याची माहिती आहे. वाशीम जिल्ह्यात 3 तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे. अद्याप वर्धा आणि गडचिरोली दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त आहेत.
नागपूर शहरात 269 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू अमरावती झाले आहेत. नागपुरात कोरोनाच्या बाधेने तीन तर अमरावती जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातही 10 जणांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. विदर्भात मृतांचा आकडा दोन जिल्ह्यात वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एका आकड्यात आहेत. बाधित रुग्ण वाढत असतानाच त्यांच्यावरील यशस्वी उपचारातून विदर्भात 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.