ठगांच्या निशाण्यावर बेरोजगार तरुण; ६७ हजार पदभरतीचे आमिष; अर्जातून मालामाल होण्याचा फंडा

Unemployed youth targeted by thugs in Yavatmal district
Unemployed youth targeted by thugs in Yavatmal district

यवतमाळ : कोविड काळात हजारोंना आपल्या नोकरीवर पाणी फेरावे लागले. त्यातच सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत. बेरोजगारांना नोकरीची असलेली निकड लक्षात घेता काही ठगबाज चांगलेच सक्रिय झालेले आहेत. सेंद्रिय शेती व खरेदी विक्री महामंडळ मर्या.च्या नावाचा वापर करीत तब्बल ६७ हजार नोकरभरतीचे आमिष दाखविले. अर्जासाठी रक्कम आकारून मालामाल होण्याचा फंडा अंमलात आणला. मात्र, त्यांचा मनसुबा अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आला.

सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या. या नावे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय यांच्याकडे नोंदणी असलेल्या संस्थेद्वारे मोठ्या प्रमाणात पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्घ झाली. कृषी आयुक्तालयाकडे तक्रार येताच त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर दिलेला क्रमांक बंद दाखवीत आहे. एकूण ६७ हजार ८१८ पदांची भरती करण्याची थाप ठगबाजांनी मारली.

अर्ज भरण्यासाठी तीनशे, पाचशे, एक हजार रुपये असे शुल्क ठेवले. संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता कोट्यवधींची माया गोळा करण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला आहे. सर्व पदांचे एका वर्षाचे एकत्रित मानधन ९७५ कोटी रुपये होते. सेंद्रिय शेतमालाची खरेदी व विक्रीसाठी मानधनावर इतका खर्च करणे शक्‍य नसल्याचे कृषी आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातही आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमीष दाखवित एका व्यक्तीने बेरोजगारांना गंडा घातला आहे. नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक करण्याचा नवीन फंडा वापरला जात असून, बेरोजगार युवकांनी सावध होणे आवश्‍यक आहे.
 
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचाही गैरवापर

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व खादी आयोग या तीन कार्यालयांमार्फत पी.एम.ई.जी. व सी.एम.ई.जी.पी. या योजना राबविण्यात येतात. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचा गैरवापर करीत लाभार्थ्यांना प्रकरणे मंजूर करण्याचे आमीष दाखविले जात आहे. ऑनलाइन अर्ज अपलोड केल्यानंतर पोर्टलवर छाननी केली जाते. यासाठी कोणत्याही संस्थेची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रार करता येणार

ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचा गैरवापर करून लाभार्थ्यांना प्रकरणे मंजूर करून देतो, असे सांगून उद्योजकांकडून त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फसवेगिरी करणारे एजंट आढळून आल्यास बळी पडू नये. असे कोणी करीत असल्याचे आढळून आल्यास पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com