संचारबंदीत या शहरवासियांची पाण्यासाठी धडपड; अशी होतेय गैरसोय

water.jpg
water.jpg

वाशीम : कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या 10 ते 11 दिवसांपासून शहरातील अनेक भागात पाणीपुरवठाच न झाल्याने तहान भागविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. एकबुर्जी जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पोलिसांचे दंडे अंगावर झेलून महिलांसह पुरुषही पाण्यासाठी वणवण भटकताना दिसून येत आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता वाढली. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन यांच्यावतीने वारंवार हात धुवा, स्वच्छता ठेवा अशा सूचना दिल्या जात आहे. दिवसेंदिवस उन्हाळा कडक होत असल्याने अनेकांनी कुलर सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

विशेष म्हणजे एकबुर्जी जलाशयात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, नगर पालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या अक्ष्यम्य दुर्लक्षामुळे शहरवासी तहानलेले आहे. पाणी ही अत्यावश्यक बाब या सदरात मोडते. त्यामुळे नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्यात कृषित पाणीटंचाईची बोंब ही शहरवासीयांच्या पाचवीलाच पुजली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शहरातील सिव्हिल लाइन, परिसर, गणेशपेठ, दंडेचौक, टिळक चौक, शिंपी वेटाळ, देवपेठ या परिसरात पाणीपुरवठा झालाच नाही. 

तांत्रिक बिघाड होत असल्याचे कारण नगर परिषदेचे अधिकारी सांगतात. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना का करण्यात येत नाही, असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे. वास्तविक इतर जिल्ह्यापेक्षा अधिक प्रमाणात पालिका नळाचा कर वसूल करते. तसेच नळाचे कनेक्शन घेतांना सुद्धा दहा ते बारा हजार रुपयांची अमानत रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरूनसुद्धा शहरवासीयांना महिन्यातून केवळ तीन ते चार वेळा पाणीपुरवठा केला जातो.

दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात
शहरात नेहमीच सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे येणारे पाणीसुद्धा गढूळ व दूषित येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन लिकेज झाल्याने गटारातील नाल्यातील पाणी या पाइपद्वारे नळाला येते. त्यामुळे शहरात कावीळ, पोटाचे आजार, अ‍ॅसिडिटी, उलट्या, ताप अशा आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

रात्री नऊच्या नंतर हातपंपावर गर्दी
गेल्या बारा दिवसांपासून शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे घरात साठवून ठेवलेले पाणी संपले आहे. दिवसभर पोलिस मारतील या भीतीने नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रात्री नऊ नंतर नागरिक शहरातील हातपंप, विहिरीवर पाणीभरण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाची भीती निर्माण झाली आहे.  

‘व्हीआयपी’ऐरीयात 24 तास पाणी
शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. याला पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारीच जाबाबदार आहेत, असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे ज्या भागात ‘व्हीआयपी’ मोठे धनदांडगे, राजकारणी, अधिकारी यांची निवासस्थाने आहेत त्या भागात 24 तास पाणीपुरवठा केला जातो. अनेक भागात तर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. उन्हाळ्याच्या दिवसात होणाऱ्या पाण्याच्या या नासाडीला जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार : सोनोने
गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या टाकीत होणाऱ्या पंपिंगमध्ये बिघाड झाला होता. मात्र, आता हा बिघाड काढण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा लवकरच केला जाणार आहे, अशी माहिती नगर पालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सोनोने यांनी दिली.

नगराध्यक्ष ‘आऊट ऑफ एरिया’
यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो ‘आऊट ऑफ एरिया’ आला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com