
अमरावती : विकासाचे केंद्रबिंदू ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतींना सध्या नोकरशाहीचे "वेसन' घालण्यात आले आहे. कोरोनामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींचा वाली सध्या प्रशासन नियुक्त अधिकारी आहेत. पर्यायाने लोकनियुक्त सरकार नसल्याचा फटका ग्रामपंचायतींना बसला असून गावातील अनेक महत्त्वाच्या योजना तसेच मंजूर झालेली कामे ठप्प असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे.
पंचायत राज्य व्यवस्थेत ग्रामपंचायतला ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानले गेले आहे. जिल्हा परिषदपेक्षाही अनेक पटींनी ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच ग्रामपंचायतींचा डोलारासुद्धा मोठा झाला. जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 524 ग्रामपंचायतींपैकी 401 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची प्रक्रियासुद्धा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती, मात्र कोरोनाचे वादळ घोंगावल्यामुळे निवडणुका स्थगित करण्यात आल्या. स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवणे गरजेचे असताना शासनाने मात्र ग्रामपंचायतींच्या चाव्या अधिकाऱ्यांकडे सोपविल्या.
पदाधिकारी घरी बसले, अनेकांनी शासनाच्या योजनांचा पाठपुरावा सोडून दिला. मंजूर कामांचा काहीच पत्ता नाही. विशेष म्हणजे पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी दिली गेली, म्हणजेच एका अधिकाऱ्याकडे साधारणपणे पाच ते आठ ग्रामपंचायतींचा कारभार असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकही जबाबदारी पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायतींच्या विकासाचा गाडा रुतून बसला आहे. दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्नच आहे. पदाधिकाऱ्यांनी हात वर केलेत, अधिकारी त्यांच्याच कामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत ग्रामपंचायती मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्या आहेत.
अमरावती 32, भातकुली 27, नांदगावखंडेश्वर 27, चांदूररेल्वे 20, धामणगावरेल्वे 34, तिवसा 24, मोर्शी 19, वरुड 41, अचलपूर 39, दर्यापूर 35, अंजनगावसुर्जी 18, चांदूरबाजार 31, धारणी 29, चिखलदरा 11 (एकूण 401)
विशेष म्हणजे, जूनमध्ये जिल्ह्यातील आणखी 123 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार असून या ग्रामपंचायतींवरसुद्धा प्रशासक नियुक्तीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
शासनाने विद्यमान ग्रामपंचायतींना मुदतवाढ देणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. अधिकाऱ्यांच्या हातात ग्रामपंचायती देण्यात आल्या. त्यांना गावाच्या विकासाचे कुठलेही सोयरसुतक राहत नाही. त्यामुळे गावांच्या विकासकामांना आता खीळ बसली आहे.
-प्रकाश साबळे, जि. प. सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.