Yavatmal News: यवतमाळ बालगुन्हेगारीच्या विळख्यात! राजकारणी-पोलीस काय करताहेत?
यवतमाळ- दिवसाला एक खून अशी परिस्थिती यवतमाळमध्ये आहे. यामध्ये लहान शाळकरी मुलांकरवी मर्डर करवून आणल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. १७-१८ वर्षांची मुलं हातात शस्त्र घेऊन फिरतात. मुलांना नकळत गुन्हेगारी विश्वात ओढण्याच काम सध्या इथं सुरु आहे. गुन्हेगारी टोळ्या तयार होत आहेत, टोळी युद्धे जास्त दिसत नसली तरी गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड आहे. काहीवर्षांपूर्वी पाकिटमारांपासून सुरु झालेला हा गुन्हेगारीविश्वाचा प्रवास खरंतर खून, दरोडे, खंडणी इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.
सध्या शाळकरी मुलांना गुन्हेगारी टोळ्यांकडून टार्गेट केलं जात आहे. एखाद्या व्यक्तीचा काटा काढायचा झाल्यास या मुलांचा वापर केला जातो आहे. मुलांना इथं अंमलीपदार्थही सहजपणे उपलब्ध होताहेत, अशी माहिती स्थानिकांशी बोलताना मिळाली. या शाळकरी मुलांमध्ये गुन्हेगारांचा मोठा इन्फ्लुअन्स दिसून येत असून यामुळं ती नकळत या नरकात ओढली जात आहेत.
राजकीय वरदहस्त
इथल्या व्हाईट कॉलर गुंडगिरीला तसेच बालगुन्हेगारांना पोसणारे राजकीय हात असल्याचं इथले जाणकार सांगतात. गेल्या दहा वर्षात इथं भूमाफियांच्या टोळ्या सुरु झाल्या पण त्याचा थेट सर्वसामान्यांना त्रास होत नव्हता. पण आता आलिकडं इथं अल्पवयीन शाळकरी मुलांना या गुन्हेगारीत ओढलं जात आहे.
मध्यंतरी एका मेडिकल डॉक्टरचा इथं खून झाला त्याला एका शाळकरी मुलाचा वापर करण्यात आला. अल्पवयीन असल्यानं जबर शिक्षा त्याला होऊ शकत नाही पण त्यातून त्यामागील सूत्रधारही समोर येत नाही. त्यामुळं राजकीय लागेबांधे असले तरी शिक्षा मात्र कोणालाही होत नाही.
गुन्हा करणारा हा राजकीय मंडळींचा वरदस्त असलेला असल्यानं त्याच्या नादी लागायला लोक घाबरतात. खरंतर या गुन्हेगारीविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केल्याचं किंवा त्यासाठी पुढे आल्याचं दिसत नाही. खरंतर हीच इच्छाशक्ती कमी पडत असल्यानं पोलीस प्रशासनं आणि राजकारण्यांवर दबाव निर्माण होत नाही, असं काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.
गुन्हेगारीमागची कारण कायं
यवतमाळमध्ये गुन्हेगारी फोफावण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बेरोजगारी. इथल्या तरुणांच्या हाताला काम नाही. रेती माफीया, भूमाफिया तसेच नशिल्या पदार्थांचं सेवन यामुळेही यवतमाळमध्ये हा गुन्हेगारीची विळखा पडलेला दिसतो.
पोलीस काय करतात?
यवतमाळमध्ये गुन्हेगारी फोफावण्यामागं पोलीस प्रशासन ढिम्म असल्याचं एक प्रमुख कारण आहे. एखादा गुन्हेगार त्रास देतो तर पीडित व्यक्तीलाच आपलं निवासाचं स्थान बदलायला सांगण्याचा प्रकारही इथं पोलिसांकडून घडल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर एका सामान्य नागरिकानं सांगितलं. एकूणच गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचं काम पोलिसांकडून होत असल्याचा स्थानिकांचा सूर आहे.
गुन्हेगारांची राजकीय इच्छाशक्ती
त्यामुळं एकूणच राजकारण त्यातून मिळालेली अमर्याद शक्ती अन् गुन्हेगारीकरण हे नेक्सस इथं पाहायला मिळत आहे. इथल्या गुन्हेगारांना राजकीय महत्वाकांक्षाही आहेत. त्यामुळं त्याची भीती वजन आणि राजकीय लागेबंधे हे देखील इथल्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर परिणाम करत आहे. (Crime News)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.