वेळापूर : दोन वर्षांच्या वियोगानंतर पंढरीच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांच्या मांदियाळीने बुधवारी सकाळी रंगलेल्या रिंगणानंतर वेळापूरजवळ आबालवृद्धांनी धावा केला. त्यानंतर भारुडाच्या माध्यमातून भक्तिरंगाबरोबर लोकरंगाची मुक्त उधळण केली. माळशिरस येथील तळावर पहाटे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी महापूजा केली. सकाळी साडेसहा वाजता माउलींचा सोहळा वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. सकाळच्या काकड्याचा अभंग गात कधी पानीवपाटी आली हे समजलेच नाही. पालखी येथील रिंगणासाठी थांबली. परंपरेप्रमाणे अश्वासह दिंड्या रिंगणात येऊ लागल्या. दिंड्यांमधून प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी मध्यभागी आणली. पालखी मधोमध रिंगणात ठेवण्यात आली. दिंड्यांमध्ये वारकरी देहभान विसरून नाचत होते. बघता बघता पालखीभोवती दिंड्यांमधील भगव्या पताकांची दाटी झाली. टाळ-मृदंगासह हरिनामाचा गजर वाढत गेला.
रिंगणात सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, योगेश देसाई, मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार आदी होते. चोपदारांनी रिंगण लावून पूर्ण केल्यानंतर भोपळे दिंडीतील मानकऱ्याने रिंगणाला दोन-तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराच्या अश्वासह माउलींचा मानाचा अश्व रिंगणात धावू लागला. वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बेफाम वेगात अश्वांनी दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर उपस्थित भाविकांची अश्वाच्या टापाखालची माती घेण्यासाठी झुंबड उडाली. उडीच्या कार्यक्रमानंतर रिंगणाची सांगता झाली.
रिंगणाचा कार्यक्रम संपवून सोहळा वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्याचवेळी हलक्याशा पावसाने हजेरी लावली. अवघा सोहळा पावसासोबत भक्तिरसात चिंब झाला. मात्र, हरिनामाचा गजर सुरूच होता. पानीवपाटीवर दुपारच्या जेवणाचा विसावा घेतला. त्यानंतर वेळापूरजवळ परंपरेप्रमाणे बाळासाहेब चोपदार यांनी एक-एक दिंडीला तुका म्हणे धावा, हा परंपरेचा अभंग म्हणत धावत सोडत होते. त्यानुसार दिंडीतील वारकरी धावत खाली वेळापूरच्या माळावर आले. सोहळा सायंकाळी सात वाजता वेळापूरमध्ये विसावला.
पावसाच्या आगमनामुळे उत्साह
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालखी सोहळ्याच्या वाटचालीत दररोज पाऊस होत आहे. त्यामुळे गावोगावी फोन करून वारकरी आपल्या गावी पाऊस झाला का? याबाबतची विचारणा करीत होते. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याचे समजताच सोहळ्यात उत्साह निर्माण झाला आहे.
वारीत चालतानाचा आनंद शब्दांत वर्णन करता येत नाही. पण, आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी पायी वारी केली पाहिजे. त्यातून मिळणाऱ्या आत्मिक आनंद घेतल्याशिवाय जीवन परिपूर्ण जीवन होऊ शकत नाही.
- लक्ष्मीबाई सद्दार, खडकी, वाशीम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.