दिलखुलास : हे ‘माझं’ आयुष्य

मंडळी, आपल्या समाजात अजूनही मुलगा किंवा मुलगी २३ ते २६ वर्षांचे झाले, की त्यांच्या लग्नाचा विचार घरातील वडीलधारे लोक करायला लागतात.
My Life
My LifeSakal
Summary

मंडळी, आपल्या समाजात अजूनही मुलगा किंवा मुलगी २३ ते २६ वर्षांचे झाले, की त्यांच्या लग्नाचा विचार घरातील वडीलधारे लोक करायला लागतात.

- कांचन अधिकारी

मंडळी, आपल्या समाजात अजूनही मुलगा किंवा मुलगी २३ ते २६ वर्षांचे झाले, की त्यांच्या लग्नाचा विचार घरातील वडीलधारे लोक करायला लागतात. नेमके त्याच वेळी तरुण मुलांच्या मनात बंडखोर विचार सुरू होतात. तुम्ही त्यांना कितीही समजावून सांगितले, तरी ते तुमचे एक ऐकत नाहीत. त्यांचा एकच घोषा चालू असतो, तो म्हणजे माझं अजून लग्नाचं वय झालेलं नाहीये. मग ते एक वेगळीच शक्कल लढवतात, जो कुणी समोर येईल त्याला नकारच द्यायचा, मग काय करू शकणार आहेत घरातील माणसं? बघतील बघतील आणि एक दिवस हा नाद सोडून देतील. या सगळ्या प्रकारात घरातील वडीलधाऱ्या माणसांना मानसिक ताणातून जावं लागतं- कारण तरुणाईचं रक्त सळसळत असतं.

काहीतरी बंडखोरी करण्याचं वय असतं. कधीकधी त्यांचं सूत दुसरीकडे कुठेतरी जुळलेलं असतं; पण घरातल्यांना ती मुलगी सून म्हणून पसंत नसते, तर कधी ‘हा निकम्मा जावई तुला आयुष्यभर नोकरी करायला लावेल,’ असं तरुणाईला सुनावलं जातं. मग काय ‘प्यार किया तो डरना क्या’ असं म्हणत हे आमचे प्रेमी जीव ‘आम्ही आजन्म अविवाहित राहू, पण तुम्ही सांगाल त्या स्थळाशी लग्न करणार नाही,’ अशी भीष्मप्रतिज्ञा घेतात.

भीष्मप्रतिज्ञा जरूर घ्या; पण राहता आई-बाबांच्या घरात, खाता- पिता तिथेच- तरीसुद्धा मनमानी यांची. अशी चित्रं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आई-बापाचं वय साठपर्यंत आलेलं असतं. मुलाचं किंवा मुलीचं वयही सगळ्या गोंधळात तीसपर्यंत आलेलं असतं. लग्नाच्या बाजारातील चांगली स्थळं तोपर्यंत लग्न करून गेलेली असतात. आता जी काही निम्मी शिम्मी लग्नाळू मुलं उरलेली असतात, त्यांच्यात यांना ‘छे, काही ऑप्शन्सच नाहीत,’ असं वाटायला लागतं. मग परत घरात धुसफूस! अहो, मी तर अशी घरं बघितली आहेत, तिथे लोक देवाला नवस बोलतात, की ‘हे परमेश्वरास माझ्या मुलीचं लग्न जमव रे बाबा.’ घरात पूजाअर्चा, भागवत वाचन सुरू करतात; पण ही मुलं त्यालाही बधत नाहीत.

यावर आता मी माझे विचार मांडते. माणसाच्या मुलाला जन्मानंतर आई-वडिलांनी शिक्षण दिल्यानंतर तरी स्वतःच्या हिमतीवर कमाई करणं गरजेचं आहे. आई- वडिलांनी तुम्हाला सज्ञान बनवलं आहे. त्याची जाणीव मुलांनी कायम ठेवावी. लग्न करणं न करणं हे तुमचं वैयक्तिक मत असेल, तर तुम्ही तुमच्या वयाच्या तिशीनंतर स्वतःचं घर घ्या आणि वेगळे राहा. एकाच छताखाली राहून स्वतःची मतं आपल्या वडिलांवर थोपवू नका- कारण असं करण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. आई-वडील आपलं सर्व आयुष्य तुमच्यासाठी झिजत काढतात. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या हौशी पण दूर ठेवतात. त्यांच्या साठीनंतर, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमचं जगा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर सतत तुमचं (तरुणाईचं) ओझं नको. कमावत्या मुलानं घरात जरूर घरखर्चासाठी पैसे द्यावेत.

माझ्या वडिलांनी मला माझ्या विसाव्या वर्षी सांगितलं, ‘मी तुला शिक्षण दिलेलं आहे. Now you earn, Learn or spend your money the way you want, but this much amount you have to pay at home...’ आणि मी माझ्या प्रथम कमाईपासून आत्तापर्यंत कमावते आहे आणि खर्च करते आहे. माझ्या विसाव्या वर्षानंतर मी त्यांच्या जीवावर जगलेली नाहीये. तेव्हा तुम्हीही हे करू शकता आणि करा. तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या टर्म्सवर जगायचं असेल, तर दुसऱ्यांचा सहारा घेणं बंद करा प्रथम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com