राज्य आणि देश सुधारण्याची जबाबदारी यिनच्‍या तरुण नेतृत्वावर.

राज्य आणि देश सुधारण्याची जबाबदारी यिनच्‍या तरुण नेतृत्वावर.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई, ता. ६ : विरोधकांनी जोरात बोलल्यानंतर त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणा लावल्या जातात. आज ईव्हीएमविरोधात लोक आंदोलन करत आहेत, परंतु माध्यमातून ते दाखवले जात नाही. अशाच प्रकारची लाखो लोकांची अनेक आंदोलनेसुद्धा माध्यमांचा विषय होत नाहीत. मूलभूत प्रश्न आणि शैक्षणिक धोरणे, महिलांचे प्रश्न आदी विषयांवर आता चर्चा होत नाहीत. आता सर्व संपलेले आहे. देशातील आणि राज्यातील नव्या राजकारणामुळे देश बिघडत आहे. ते सुधारण्याचे काम ‘यिन’च्या नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्ही येऊन करू शकाल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आज सुरू झालेल्या ‘यिन’च्या अधिवेशनात केले.

देश हा नीतिमत्तेवर चालला पाहिजे, परंतु नीतिमत्ता जिथे संपते तिथे देशाचे अतोनात नुकसान होते. सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळते. पर्यावरणाचा आपण विचार करत नाही. राजकारणात सत्ता आणि पैसा आणि पैशांवर राजकारण असे सुरू आहे. पैसा टाकून सत्ता मिळवणे, असे प्रकार सुरू आहेत. अशा स्थितीत राज्याला बाहेर काढण्याची महाराष्ट्र आणि देशाला नव्याने उभे करण्याची जबाबदारी यिनच्या नेतृत्वावर असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यात मराठा आणि ओबीसी एकमेकांविरोधात उभे आहेत. गाव एकत्र राहिला नाही. तो एकत्र राहिला पाहिजे. त्यामुळे आपसात जे विविध विषयांतून भांडण लावण्याचे काम केले जात आहे ते संपवण्याची जबाबदारीही तुमच्यावर असल्याचे वडेट्टीवार यांनी ‘यिन’च्या मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करताना सांगिले.

राजकारणाची परिभाषा ही माणूस असली पाहिजे. त्यातूनच माणसातला देव शोधावा. मी शालेय शिक्षण घेताना बेरोजगारांची संघटना बांधून राजकारणात आलो तेव्हा माझे वय २१ वर्षे होते. त्या वेळी मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झालो होतो. माझ्यामध्ये सामाजिक कार्यातूनच राजकारणातील जिद्द निर्माण झाली. तीस वर्षे मी सक्रिय राजकारणात आहे. राजकारणातला आणि माणसातला बदल मी पाहतोय. एकेकाळी गावात गेल्यावर लोकांचा जो सन्मान मिळायचा, लोक दरवाजात आमच्यासाठी उभे राहायचे. तेच लोक आता दरवाजाबाहेर येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणात लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. राजकारणात जी अनास्थेने बघण्याचा दृष्टिकोन विचित्र झाला आहे. अलीकडे ही सर्व परिस्थिती बदलण्याची तयारी तरुण-तरुणींनी करायला हवी. ते बदल नक्कीच करू शकतील.

बलिदानाने देश उभा राहिला

देशात अलीकडे न्यूनगंड खूप मोठ्या प्रमाणात बळावला असून नकारात्मक भावनादेखील वाढत आहे. राजकारणात सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता अधिक दिसते. महात्मा गांधींनी शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत पूर्ण कपडे मिळणार नाहीत, तोपर्यंत आपण पंचावर राहण्याचा निर्णय घेतला. हा देश उभा करणे इतके सोपे नव्हते. अनेकांनी गोळ्या खाल्ल्या, अनेक जण फासावर गेले, चाफेकर बंधूसारख्या दोन भावांचे बलिदान स्वातंत्र्यासाठी होते, म्हणूनच हा देश उभा राहिला.

संविधान हे सर्वश्रेष्ठ

राजकारणात सर्व श्रद्धा ही संविधानावर असली पाहिजे, संविधान हे कवच आहे. संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही. हा देश संविधानाने चालला पाहिजे. आज आपण देशाची प्रगती ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करत आहोत. अध्यात्मही असले पाहिजे. बोध आणि शोध हे दोन्हीही गरजेचे आहेत. माणूस म्हणून जगण्याचा मार्ग अध्यात्म देतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी या महत्त्वाच्या असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com