Electricity Power supply off
Electricity Power supply offesakal

चाळीसगावात ४८ तासांपासून अंधार

चाळीसगाव : शहरासह परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागात वीज तारांवर झाडे उन्मळून पडल्याने व काही ठिकाणी विद्युत खांबच जमिनदोस्त झाल्याने संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तब्बल ४८ तासांपासून शहर अंधारात आहे. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असून संपूर्ण वीज पुरवठा सुरु होण्यासाठी शहरवासीयांना किमान आणखीन २४ तास तरी वाट पहावी लागणार आहे.

शहरासह परिसरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते केले. सुमारे अर्धा तास वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक घरांवरील पत्रे उडाली. काही इमारतींवरील सोलरच्या प्लेट्सही उडाल्या. शहरातील टिळक चौक, कचेरी परिसर, घाट रोड, बायपाससह इतरही अनेक भागात उभी झाडे उन्मळून पडली. दुकानांचे फलक उडाले, झाडांखाली दुचाकी, चारचाकी दबल्या गेल्या. काही भागात झाडे व झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. सुदैवान यात जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काल रात्री अंधारामुळे मदतकार्यात व्यत्यय येत होता. आज सकाळपासूनच नुकसान झालेल्या भागात नागरिकांनी एकमेकांच्या सहकार्यातून रस्त्यांवर, टपऱ्यांवर पडलेली झाडे बाजूला केली. शहरातील मालेगाव बायपासजवळील चेतना मंगल कार्यालयाचे तर सर्व पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

वादळाचा जोर एवढा होता, की ट्रान्सफार्मर असलेले वीज खांब वाकले गेले. वीज कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रस्त्यावरील पाच ट्रान्स्फार्मर सद्यःस्थितीत बंद असल्याने या भागाचा वीज पुरवठा पूर्णतः खंडीत झाला आहे.

Electricity Power supply off
वादळात वीजतारा कोसळून विजेच्या धक्क्याने बालक ठार

जवळपास अशीच परिस्थिती शहरातील इतरही भागात असल्याने काल सायंकाळपासून शहर अंधारात आहे. मालेगाव रस्त्यावरील प्रभाकर जाधव यांच्या कार्यालयाजवळील विशाल नंदन नगरातील डी. पी. असलेले खांब जमिनदोस्त झाले आहेत. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. वादळामुळे सर्वाधिक नुकसान महावितरण कंपनीचे झाले असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान २४ तास तरी प्रतीक्षा करावी लागेल, असे वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

आवश्‍यक वस्तूच उपलब्ध होईनात

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सज्ज असले तरी वीज जोडणीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक त्या वस्तू कंपनीकडून तातडीने मिळत नसल्याने दुरुस्तीच्या कामात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच महावितरण कंपनीचे जळगाव जिल्हा अधीक्षक फारूख शेख हे फोनच घेत नसल्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, हे समजू शकलेले नाही. एकूणच सध्या संपूर्ण शहर अंधारात असताना वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून किमान आवश्‍यक ते साहित्य तातडीने उपलब्ध करुन शहराचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Electricity Power supply off
रिक्षावर झाड कोसळल्याने चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com