नुकसान लाखांत अन्‌ मदत मिळणार हजारांत

kuldeep-hole
kuldeep-hole

पुणे - अतिवृष्टीत सोयाबीन सगळं गेलं...सांगणार तरी कोणाला...सरकारला सांगून फायदा नाही... नुकसान झालंय लाखाचं.. नुकसान भरपाई मिळते दोन पाच हजार.. हे सांगून कोणाला काय फायदा नाय...! आर्वी (ता. जुन्नर) येथील साठीतले वृद्ध शेतकरी दिवाळीसाठी लागवड केलेल्या झेंडूंला पाणी देता देता बोलत होते. नुकसान तर झालंय पण तेच धरून बसलं तर कसं होईल.. पुढची पिकं घेतली तर पाहिजेत. आता गोंडा (झेंडू) लावलाय. बघू दिवाळीत किती पैसे होतील. असे सांगत संकट विसरून पुढच्या कामाला लागले होते. फोटो काढू म्हटल्यावर फोटो देखील काढून दिला नाही आणि नावही सांगितलं नाही. नाव पेपरात छापून सरकार काय दखल घेणार आहे का माझी, असे सांगत फोटो काढू दिला नाही. 

अशीच अवस्था पेठ (ता. आंबेगाव) येथील सुभाष रघुनाथ रासकर यांची निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे ९ एकरांवरील बटाटा सडला. यामुळे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे रासकर सांगत होते. बटाटा नुकसानीनंतर आता रब्बीच्या ज्वारीच्या पेरणीची त्यांची लगबग सुरू होती. निसर्गांच हे असंच असतं. तीन वर्षं चांगलं उत्पादन देतो. मात्र एखाद्या वर्षी सगळं हिरावून नेतो. यामुळे गेल्या तीन वर्षांत कमवलेले सगंळ एका वर्षाच्या नुकसानीत जात. पंचनामे झालेत. पण भरपाई थोडीच सगळी मिळणार आहे? आता कांदा लावायचा होता. पण कांद्याची १० किलो बियाण्याची रोपं निसर्ग चक्रीवादळात गेली. यामुळे या वर्षी कांदा नाही आणि बटाटा पण नाही, अशी अवस्था रासकर यांची आहे. 

तर बळिराम काळे (पेठ, ता. आंबेगाव) यांचंही साडेतीन एकरांवरील सोयाबीन भिजलं. आता काढून वाळवून काढणी सुरू केली, तर सगळं काळं बी येतंय. ५० कट्टे झाले असते, तर आता २० कट्टे होतील. अशी व्यथा ते सांगत होते. 

बळिराम होले (होलेमळा, दत्तनगर, ता. खेड) यांनी अर्धा एकरावर सात हजार रोपांची कोबीची लागवड केली होती. पण ऐन फुगवणीच्या काळातच अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साठलं सगळी कोबी भिजून सडली. पाऊस उघडल्यावर आता त्यांचे कुटुंबीय राहिलेली कोबी काढून स्थानिक बाजारात विक्री करण्याची धडपड करत आहेत.   

फळबागेचे स्वप्न नव्या विहिरीसह बुजले - सुरेश उंद्रे
अतिवृष्टीने वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील सुरेश उंद्रे यांची नवी विहीर पूर्ण बुजून गेली. त्यात असलेली मोटर, इंजिन आदी वाहून गेले. उंद्रे कुटुंबीयांनी दोनच वर्षांपूर्वी १५ लाखांचे कर्ज काढून विहीर खोदत फळबागेचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न विहिरीसह बुजले. करंदी-धामारी रस्त्यावर असलेले तीन बंधारे पूर्ण वाहून गेले तर एक बंधारा स्थानिक शेतकरी प्रकाश दरेकर व इतरांमुळे वाचला. या दुर्घटनेत वाहून गेलेल्या बंधाऱ्यातील पाण्यामुळे जवळच असलेल्या उंद्रे कुटंबीयांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यात मदतनिधीची मागणी रुपयांत
पिकांचे नुकसान : ५८ कोटी ७७ लाख
शेतजमिनीचे नुकसान : २ कोटी १३ लाख
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी मदत : ५४ लाख
मृत पशुधनासाठी : ६६ लाख
घरात पाणी गेल्यामुळे सानुग्रह अनुदान : तीन कोटी ८० लाख
पूर्ण नुकसान झालेल्या कच्च्या आणि पक्‍क्‍या घरांसाठी : चार लाख ७५ हजार
अंशत: नुकसान झालेल्या कच्च्या आणि पक्‍क्‍या घरांसाठी : ९३ लाख
नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी : ४८ हजार
गोठ्यांचे नुकसान : नऊ लाख २६ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com