शेतकरी करताहेत 'या' रोपांची शोधाशोध

शेतकरी करताहेत 'या' रोपांची शोधाशोध

नाशिक - कांद्याची आवक घटल्याने दरात असलेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काहींनी पुन्हा बियाणे टाकून रोपे तयार केली असली तर रोपे विरळ झाल्याने कांदा लागवडीचे गणित बिघडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक रोपांच्या शोधात थेट शेजारील जिल्ह्यात जात आहेत. 

उन्हाळ कांद्याची बाजारात होणारी आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने उन्हाळ कांद्याने नऊ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे कांदा लागवडीला शेतकरी यंदा ही पसंती देत आहेत. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने रोपांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याच्या लागवडीवर परिणाम दिसून येत आहेत. एकंदरीत महिनाभर कांद्याच्या लागवडी पुढे गेल्या आहेत. रोपांचे क्षेत्र अडचणीत आल्याने वाचलेल्या रोपांना भाव आला आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ३३७ हेक्टरवर रोपवाटिका तयार करण्यात आल्या. मात्र रोपे खराब झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर रोपे टाकण्यात आली. त्याचे क्षेत्र ७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर गेले आहे. त्यात कृषी विभागाने नुकसानीचा आकडा ७ हजारांपर्यंत प्राथमिक अंदाजात वर्तविला होती. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर रोपांची टंचाई आहे. एक एकर कांदा रोपांसाठी तीस ते पस्तीस हजारांचा दर सुरू असल्याने शेतकऱ्यांना रास्त भावात रोप मिळण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. 

मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर रोपे असताना शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी नसल्याने लागवडी कमी झाल्या. मात्र चालू वर्षी पाणी आहे, मात्र लागवडीसाठी रोपे उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकूणच कांद्याच्या आगारात शेतकऱ्यांना रोपांऐवजी इतर पिकांकडे वळण्याची वेळ आल्याने उन्हाळं कांदा लागवडी उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शेतात असलेल्या रोपाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र आम्हालाच रोपे कमी पडणार असल्याने विक्री न करता लागवड करणार आहे. 
- संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला 

या वर्षी रोपवाटिका ३० टक्क्यांनी खराब आहेत. त्यामुळे पुन्हा रोपे टाकण्याची वेळ आली. मात्र लागवडी करण्यासाठी कामकाज लांबणीवर आहे. रोपे नसल्याने अनेक नातेवाईक विचारणा करतात, मात्र आमच्याकडे रोपे नसल्याने आम्ही थेट नकार देत आहोत.
- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण

इतर जिल्ह्यांमध्ये शोध
नाशिक जिल्ह्यात कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर या तालुक्यांत तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व श्रीरामपूर तालुक्यांत रोपांची शोधाशोध सुरू आहे. तर नांदगाव, चांदवड, सिन्नर या भागांत रोपे पाहण्यासाठी वर्दळ दिसून येते. तर नांदगाव, येवल्याच्या उत्तर व चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी विक्रीसाठी रोपे सध्या उपलब्ध असल्याने शेतकरी आगाऊ पैसे देऊन रोपे लागवडीसाठी आरक्षित करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com